डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची लढाई पुढे नेणे हीच खरी आदरांजली; हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्र

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची परंपरा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.

पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहून सपकाळ यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी गांधी स्मारक निधीचे विश्वस्त तुषार गांधी, अन्वर राजन, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार उल्हासदादा पवार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चव्हाण, प्रवीण सप्तर्षी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आयुष्यभर गांधीवादी विचार, भारतीय संविधान आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी संघर्ष केला. गांधींच्या मारेकऱ्यांच्या विचारसरणीला आणि प्रतिगामी प्रवृत्तींना त्यांनी ठामपणे विरोध केला. आजच्या काळात त्यांनी जपलेली विचारांची परंपरा आणि संविधान, लोकशाही तसेच गांधीवादी मूल्यांच्या रक्षणाची लढाई अधिक जोमाने पुढे नेण्याची गरज आहे.

ते पुढे म्हणाले की, डॉ. कुमार सप्तर्षी हे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारविश्वातील एक दीपस्तंभ होते. विचारांप्रती निष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनाची अखंड तळमळ हीच त्यांची खरी ओळख होती. समाजपरिवर्तनासाठी दिलेले त्यांचे योगदान, युवकांना दिलेली वैचारिक दिशा आणि अन्यायाविरोधातील त्यांचा संघर्ष कायम प्रेरणादायी राहील, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत