नायगाव बीडीडीवासीयांचे स्वप्न साकार; ८६४ घरांचे वितरण

महाराष्ट्र

मुंबई: नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकुलातील ८६४ सदनिकांचे वितरण उत्साहात पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चाव्यांचे प्रातिनिधिक वाटप करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते.

या सोहळ्यामुळे बीडीडी चाळीत राहणाऱ्या नागरिकांचे ‘स्वतःचे घर’ हे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले असून, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद विशेष उल्लेखनीय होता. यावेळी बोलताना शिंदे यांनी सांगितले की, चाळ संस्कृतीतून टॉवरमध्ये जाण्याचा हा बदल अनेक कुटुंबांसाठी आयुष्य बदलणारा ठरणार आहे.

ते पुढे म्हणाले की, या प्रकल्पाची सुरुवात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात झाली होती. सरकार बदलामुळे काही काळ कामाची गती मंदावली, मात्र २०२२ नंतर पुन्हा प्रकल्पाला वेग देण्यात आला. अल्पावधीत महत्त्वाचे निर्णय घेत पोलिसांसाठीही सवलतीत घरे उपलब्ध करून देण्यात आली.

बीडीडी चाळींना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. स्वातंत्र्य चळवळ, गिरणी कामगारांचा सुवर्णकाळ आणि विविध सामाजिक चळवळींच्या त्या साक्षीदार आहेत. अनेक पिढ्या या चाळीत राहिल्या असून, मर्यादित जागेत जीवन जगण्याच्या अडचणी लक्षात घेऊनच पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“घर हे केवळ निवारा नसून आत्मसन्मान, सुख-समृद्धी आणि स्थैर्याचा पाया आहे,” असे सांगत शिंदे यांनी महायुती सरकार सर्वसामान्यांना हक्काचे घर देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नमूद केले.यावेळी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांना शुभेच्छा देत, “यंदाची गुढी तुम्ही नवीन घरात उभाराल, हीच खरी आनंदाची बाब आहे,” असेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, डॉ. नीलम गोऱ्हे, चित्रा वाघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.