लाल दिव्याची गाडी सोडून गेलो अन्‌…

महाराष्ट्र राजकीय

पुणे: माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पालक म्हणून एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेल्यानंतर आलेला अनुभव आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सांगितला.

‘तुम्ही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहात हे कोणाला सांगू नका, लाल दिव्याची गाडी आणि पोलिसांचा ताफा अजिबात आणू नका,’ असे मुलीने मला स्पष्टपणे बजावले. त्यानुसार मी सामान्य पालकांप्रमाणे गेलो तर मी मंत्री असताना तब्बल एक तास वेटिंग केल्यानंतर त्या शाळेतील शिक्षकांनी माझ्याशी संवाद साधला, असा किस्सा वळसे पाटलांनी सांगितला.

आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिपदी असताना घडलेला एक किस्सा सांगितला. तो किस्सा सांगून त्यांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पालकांनी नियमितपणे आढावा घ्यावा, असेही सांगितले.

मुंबईतील एका नामांकित शाळेत पालक म्हणून आलेला अनुभवही वळसे पाटील यांनी या वेळी सांगितला. मी राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होतो. मुंबईतील (Mumbai) एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत माझी कन्या पूर्वा वळसे पाटील ही शिकत होती. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये नियमितपणे पालक बैठक होत असतात.

मी राजकारण, मंत्री म्हणून राज्याच्या कारभारात व्यस्त असल्यामुळे माझी पत्नी किरण वळसे पाटील ह्या नेहमी पालक बैठकीला जात असत. पण एकदा त्या बाहेरगावी गेल्या होत्या आणि पालक बैठक लागली होती. त्या बैठकीला पालक म्हणून जाणे अनिवार्य होते. त्यामुळे मंत्री असलो तरी वेळ काढून मला स्वतःलाच बैठकीसाठी जावे लागले, असेही वळसे पाटील यांनी नमूद केले.

ते म्हणाले, बैठकीला येण्यापूर्वी मुलगी पूर्वा हिने मला स्पष्टपणे सांगितले होते की, तुम्ही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहात, हे कोणालाही सांगू नका. पालक बैठकीला येताना लाल दिव्याची गाडी किंवा बंदोबस्तासाठी असलेला पोलिसांचा ताफा अजिबात सोबत आणून नका. मुलीने सांगितल्यामुळे मी तिचे ऐकले आणि एक सर्वसामन्य पालकाप्रमाणे मी बैठकीला गेलो.

मी राज्याचा कॅबिनेट मंत्री असून त्या नामांकित शाळेत मला एक तास वाट पाहत थांबावे लागले. त्यानंतर तेथील शिक्षकांनी मला संवाद साधण्याची संधी दिली, असा किस्सा वळसे पाटील यांनी सांगितला. प्रत्येक दोन महिन्यांनी गावातील पालकांनी शाळेत येऊन आपल्या मुलांच्या प्रगतीचा आढावा घ्यावा. जेव्हा शाळेकडून निमंत्रण मिळेल, तेव्हा वेळ काढून जरूर उपस्थित राहावे, असे आवाहनही वळसे पाटील यांनी केले.