बीड: काही क्षण हे शब्दात मांडण्याच्या पलीकडचे असतात. अश्रूंमध्ये साठवलेल्या आठवणी, हृदयात दडलेली आस आणि काळजाच्या एका कोपऱ्यात जपलेली शेवटची आशा. हे सगळं आज एका क्षणात खरं ठरलं आहे, जेव्हा 2017 पासून हरवलेला मुलगा तब्बल आठ वर्षांनंतर आपल्या आई-वडिलांच्या मिठीत परत आला. हे शक्य झालं बीड पोलिसांच्या सततच्या प्रयत्नातून आणि त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर.. “आम्ही फक्त नातं पुन्हा जुळवून दिलं.”
2017 मध्ये हरवला होता मुलगा
2017 मध्ये हरवलेला तो मुलगा तेव्हा अवघ्या 16 वर्षांचा होता. घरातून बाहेर पडल्यावर तो पुन्हा परतलाच नाही.
आई-वडिलांनी कळजावर दगड ठेवला
शोधाशोध झाली, रात्रंदिवस डोळ्यात आसवांच्या धारांसह त्याची वाट पाहणाऱ्या आई-वडिलांची आशाही मावळली. त्यांनी काळजावर दगड ठेवत त्याला गमावल्याचं मान्य केलं, पण मन कुठे मान्य करतंय.
अखेर हरवलेला पोरगा सापडला
या प्रकरणाचा धागा पकडत बीड पोलिसांनी पुन्हा एकदा त्याच्या शोधाला सुरुवात केली. अनेक तांत्रिक तपास, चौकशा, आणि शंभरहून अधिक तुकड्यांना एकत्र करून अखेर त्यांनी त्या हरवलेल्या पोराचा थांगपत्ता लावला.
आईने लगेच मुलाला मिठीत घेतल
तो क्षण अवर्णनीय होता जेव्हा त्या आई-वडिलांसमोर त्यांच्या “मृत” समजल्या गेलेल्या मुलाने जिवंतपणे उभं राहत हात पसरवले. एका क्षणात आईने त्याला मिठीत घेतलं, वडिलांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, आणि तिथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळले.
कुटुंबाच्या आयुष्यात पोलिसांमुळे आनंद परतला
पोलिसांनी केवळ एक गुन्हा उघडकीस आणला नाही, तर एका कुटुंबाच्या जीवनात पुन्हा प्रकाश फुलवला.
आईचं लेकरु परत आल
आयुष्यभर न विसरता येणाऱ्या या भेटीत, फक्त मुलगाच नव्हे, तर नातंही परत आलं.. जिवंत, श्वास घेणारं आणि प्रेमाने ओथंबलेलं.
बीड पोलिसांचं सर्वत्र कौतुक
बीड पोलिसांच्या या संवेदनशील कार्याचं सर्वत्र कौतुक होत असून, त्यांनी खरं तर फक्त एक शोध नव्हे, तर एका हताश आईच्या काळजाला “माझं पोरगं परत आलं…” हे सांगण्याची संधी दिली.