छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा जनगर्जना मोर्चा…

महाराष्ट्र

हजारो नागरिकांनी घेतला मोर्चात सहभाग

औरंगाबाद: काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने औरंगाबाद’चे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद, धाराशिव करण्यास परवानगी दिली. मात्र, या निर्णयाला विरोध करत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषण केले. मात्र, याचा विरोध करण्यावरुन आधी मनसेनेही मोर्चा काढला आणि आता आज सकल हिंदू समाजाने ‘जनगर्जना मोर्चा’ काढला. यावेळी गोहत्या, धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणीदेखील करण्यात आली. या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही हा मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चामध्ये अनेक तरुणांनी, महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी मोर्चात सहभागी झालेले मंत्री अतुल सावे म्हणाले की, “खासदार इम्तियाज जलील यांनी आधी स्वतःच्या घरातील एखाद्या व्यक्तीचे नाव औरंगजेब ठेवावे, त्यानंतर जिल्ह्याचे नाव औरंगाबाद करण्याचा प्रयत्न करावा.” दरम्यान, शहरातील क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती.

यामध्ये विश्व हिंदू परिषद, भाजपा, शिवसेना यांच्यासह इतर संघटनांनी सहभाग नोंदवला. मात्र सामाजिक शांतता बिघडेल, त्यामुळे परवानगी नाकारल्याचे पोलिसांनी आयोजकांना सांगितले. तरीदेखील क्रांती चौक भागातून भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तेलंगणाचे भाजप आमदार राजा सिंह ठाकुर, शिवेंद्रे राजे भोसले यांच्यासह केंद्रीय मंत्री भागवत कराड, राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्यासह इतर नेते सहभागी झाले.

सकल हिंदू समाजाच्या वतीने क्रांती चौक भागातून दुपारी बाराच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला. औरंगपुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ या मोर्चाची सांगता करण्यात आली. जवळपास एक किलोमीटर लांब इतकी गर्दी या मोर्चात सहभागी झाली. हजारो नागरिकांनी हातात भगवे ध्वज घेत छत्रपती संभाजीनगर या नावाला समर्थन दर्शविले आहे.