शेतकरी आत्महत्यांवरील चर्चा नाकारल्याने विरोधकांचा विधानसभेत सभात्याग.

महाराष्ट्र

मुंबई: राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांचा अत्यंत गंभीर मुद्दा आज विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केला. मात्र, या विषयावर चर्चा घेण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने काँग्रेससह विरोधी पक्षांच्या आमदारांनी सभागृहातून सभात्याग केला.

विजय वडेट्टीवार यांनी पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच लातूरमध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख करत, राज्यातील शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती, वाढते आर्थिक संकट आणि आत्महत्यांची मालिका लक्षात घेता या विषयावर सभागृहात तातडीने सविस्तर चर्चा होणे आवश्यक असल्याची मागणी केली. मात्र, सरकारने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांना पुन्हा एकदा बिश्नोई गँगकडून धमकीचे फोन येत असल्याचा गंभीर मुद्दाही सभागृहात उपस्थित करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आमदार पठाण यांना अतिरिक्त सुरक्षा द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना २५ सुरक्षा रक्षक देण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे धोका असलेल्या लोकप्रतिनिधींनाही आवश्यक सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी म्हटले.

यावर विधानसभा अध्यक्षांनी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची असून, धोक्याचे मूल्यांकन करून आवश्यक ते संरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन दिले.मात्र, राज्यातील शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हा सर्वाधिक प्राधान्याचा विषय असूनही त्यावरील चर्चा नाकारण्यात आल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांच्या आमदारांनी सभागृहातून सभात्याग केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत