मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला अधिकृत सुरुवात झाली असून, या निमित्ताने त्यांच्या प्रभावी आणि परखड भाषणांची पुन्हा एकदा आठवण करून दिली जात आहे. बाळासाहेबांची भाषणे आजही लाखो शिवसैनिक आणि मराठी माणसासाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना, “बाळासाहेब म्हणजे तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणी” अशा शब्दांत गौरव केला. मोदींवरही बाळासाहेबांच्या भाषणांचा खोल प्रभाव असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच आपल्या वडिलांकडून मिळालेल्या आत्मबळ आणि आत्मविश्वासाच्या मंत्राचा उल्लेख केला. “शिवसैनिक हीच माझी खरी ताकद आहे. शिवसैनिकांशिवाय मी स्वतःला शिवसेनाप्रमुख मानू शकत नाही,” असे ते अनेक भाषणांत ठामपणे सांगत असत.
मुंबईत मराठी माणसाचा कणा ताठ करण्याचे काम शिवसेनेने केल्याचा अभिमान बाळासाहेबांनी व्यक्त केला होता. “शिवसेना नसती, तर मराठी माणूस मुंबईतून फेकला गेला असता,” असे परखड विधान त्यांनी केले होते. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येऊन पक्षाशी गद्दारी करणाऱ्या आमदार-खासदारांनाही त्यांनी कडक शब्दांत इशारा दिला होता.
मराठी तरुणांनी केवळ नोकऱ्या मागणारे नव्हे, तर नोकऱ्या देणारे उद्योजक बनावे, अशी त्यांची अपेक्षा होती. मुंबईला सिंगापूर, हाँगकाँग किंवा मलेशियासारखे सुंदर शहर बनवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. मात्र शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांचीही असल्याचे ते स्पष्टपणे सांगत.
हिंदुस्तान हे हिंदू राष्ट्रच आहे आणि त्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही, असे मत बाळासाहेबांनी वारंवार मांडले. तसेच गांधी घराण्याच्या राजकारणावर टीका करत, नेहरूंच्या धोरणांमुळेच काश्मीर प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याचा आरोपही त्यांनी केला होता. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, भाषणे आणि त्यांचा वारसा पुन्हा एकदा जनतेसमोर येत असून, ते आजच्या पिढीसाठीही दिशादर्शक ठरत आहेत.