मराठवाडा वॉटर ग्रीडमुळे ‘दुष्काळ’ इतिहासजमा होणार; निधी कमी पडू देणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आधीच्या सरकारने बासनात गुंडाळून ठेवला होता. मात्र आमच्या सरकारने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा सुरू केला असून मराठवाड्यातील ‘दुष्काळ’ हा शब्द कायमचा पुसून टाकण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. यासाठी निधीची कमतरता कधीही भासू दिली जाणार नाही, असे ठाम प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. सभेला प्रचंड गर्दी उसळली होती.

यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार संजना जाधव, आमदार प्रा. रमेश भोरनारे, पक्षाचे पदाधिकारी, उमेदवार व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

सभेला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत शिंदे म्हणाले की, राज्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे दुःखाचे सावट आहे. त्यांनी दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी नमूद केले.

कन्नड तालुक्याला अपेक्षेप्रमाणे विकास निधी मिळाला नसल्याचे मान्य करत, येत्या काळात कन्नडचा विकास बॅकलॉग पूर्णपणे भरून काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

‘लाडक्या बहिणींच्या पाठिंब्याने विजय निश्चित’

महिलांच्या सहभागावर भर देताना शिंदे म्हणाले, “ज्या उमेदवारांच्या पाठीशी लाडक्या बहिणी उभ्या असतात, त्यांचा विजय निश्चित असतो.”

आपण शेतकऱ्याचा मुलगा असून गरिबी जवळून पाहिल्यामुळेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सुरू केली, असे त्यांनी सांगितले. या योजनेवर वर्षाला सुमारे ४५ हजार कोटी रुपये खर्च होत असून तो खर्च अर्थव्यवस्थेला चालना देणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षण, शेतकरी आणि आरोग्याला प्राधान्य

उच्च शिक्षणासाठी १०० टक्के फी माफी, शेतकऱ्यांसाठी पीक विमा, नुकसान भरपाई, ३२ हजार कोटींचे पावसाळी पॅकेज आणि कर्जमाफी अशा अनेक निर्णयांचा उल्लेख त्यांनी केला.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत ७० ते ८० हजार रुग्णांना सुमारे ४५० कोटींची मदत देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका

विरोधकांवर नाव न घेता टीका करताना शिंदे म्हणाले, “काही लोक फक्त आरोप आणि घोषणा करतात. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. सत्ता येते-जाते, पण दिलेला शब्द पाळणारे नेते जनतेच्या मनात कायम राहतात.”

भाषणाच्या शेवटी येत्या ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबून सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

“संभाजीनगर हे ऐतिहासिक शहर आहे. जिल्हा परिषदवर विकासाचा भगवा फडकवायचा असेल, तर सर्व उमेदवारांना निवडून द्या. निधी कधीही कमी पडू देणार नाही, हा शब्द मी देतो,” असे सांगत त्यांनी भाषणाची सांगता केली.