धनंजय मुंडेंची खंत; दोनशे दिवस न बोलता काढलेत पण या दोनशे दिवसांतील एक गोष्ट माझ्या जिव्हारी लागलीय

महाराष्ट्र राजकीय

बीड: मी बऱ्याच दिवसांनी बोलतोय… माझी न बोलण्याची डबल सेंच्युरी झाली आहे. तब्बल दोनशे दिवस न बोलता काढले आहेत. या दोनशे दिवसांमध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या, त्यापैकी एक गोष्ट माझ्या जिवाला आणि जिव्हारी लागली.

ती म्हणजे आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी. ज्यांनी कोणी आणली. भलेही तो बीडच्या मातीतला असेल अथवा बीडच्या मातीच्या बाहेरचा. त्याला एवढचं सांगायचं, वैर जर माझ्याशी होतं, तर माझ्या या मातीची (बीडची) बदनामी का? असा सवाल माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘निर्धार नवपर्वा’च्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे आज (ता. २० जुलै) बीडच्या दौऱ्यावर आले होते. या ‘निर्धार नवपर्वा’च्या कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, मला आज भाषण करायचं नाही, अशी विनंती मी सुनील तटकरे यांना केली होती. त्यामागचं कारण त्यांना सांगितलं नव्हतं. पण तुमच्यासमोर कारण सांगावं लागेल. इथं बोलावं की मैदानात बोलावं, असा प्रश्न माझ्या मनात होता. तो आताही आहे.

आज आपण इथे ज्या कामासाठी आलो आहे, ते काम आपल्याला माहिती आहे. आजपर्यंत जे करत आलो आहे, तेही आपल्याला माहिती आहे. निर्धार नवपर्वाच्या निमित्ताने आपणा सर्वांना एकत्रित करून बीडने एक आगळा वेगळा इतिहास सर्व महाराष्ट्राला दाखवावा, याच अपेक्षेने सुनील तटकरे आज बीडमध्ये आले आहेत. आपण सर्वजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड जिल्ह्याप्रती असलेली अपेक्षा नक्कीच पूर्ण करू, असे वचन मी तटकरे यांना आपल्या सर्वाच्या वतीने देतो, असेही त्यांनी नमूद केले.

धनंजय मुंडे म्हणाले, ज्यांनी ज्यांनी बीडची बदनामी केली, त्यांना एवढचं सांगायचं की, वैर जर माझ्याशी होतं, तर माझ्या या मातीची (बीडची) बदनामी का? पण ‘हे बरे झाले, दिला अंधार तू इतका, एक ठिणगी आता लागली गुजरायला…’

ज्यांनी ज्यांनी बाहेरून येऊन मधल्या काळात ‘एक घटना; एक व्यक्ती, एक जिल्हा; एक माती, एक माती; एक मतदारसंघ अशा पद्धतीने बदनामी केली. त्यांच्या प्रती चार ओळी म्हणणार आहे आणि माझं भाषण संपवणार आहे. ‘तुम्हारे सोच के साचे में मै ढल नही सकता, जुबान काट लो, लहेजा बदल नही सकता.. अरे मुझे भी मूंग का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारे लोहसे ये लोहा बिघल नही सकता, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

अनेक दिवसांनंतर तटकरे यांचे बीडमध्ये आगमन झाले आहे. ते ज्या अपेक्षने येथे आले आहेत, त्या अपेक्षा आपण सर्वजण पूर्ण करूया, हा विश्वास त्यांना पुन्हा एकदा देतो, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.