काळ आला होता, पण वेळ आली नव्हती; हार्ट अटॅक आलेल्या शिक्षकासाठी डॉक्टरच देवदूत ठरले

महाराष्ट्र

नंदूरबार: मुलीच्या उपचारासाठी रुग्णालयात आले असताना तिच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते बेशुद्ध होऊन त्यांनी मान टाकली. सोबत असलेल्या मुलीच्या आणि पत्नीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती असेच म्हणावे लागेल. त्यावेळी डॉक्टर देवा सारखे धावून आले. त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका आदर्श शिक्षकाचे प्राण वाचल्याची सुखद घटना तळोदा शहरात घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये काहीच झाले असून डॉक्टरांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

अचानक बेचैन होऊन बेशुद्ध झाले

तळोदा शहरातील नेमसुशील विद्यामंदिर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या 42 वर्षीय रविंद्र अरुण गुरव हे आपल्या मुलीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात आले होते. त्यावेळी डॉक्टरांसमोर बसले असताना ते अचानक बेचैन झाले. बेचैन अवस्थेत असताना अचानक ते बेशुद्ध होऊन त्यांनी मान टाकली. सोबत असलेल्या त्यांची कन्या व पत्नीच्या डोळ्यात अश्रू दाटले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ. योगेश चौधरी यांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णाला हेड-लो पोजिशनमध्ये घेतले. तत्पश्चात तपासणीदरम्यान रुग्णाचे हृदय आणि ठोके थांबल्याचे निदर्शनास आले. हृदयक्रिया थांबल्याचे लक्षात येताच डॉ. चौधरी यांनी तातडीने सीपीआर प्रक्रिया सुरू केली. काही क्षणांतच हृदय पुन्हा चालू झाले आणि शरीरातील रक्तपुरवठा पूर्ववत झाला. रुग्ण शुद्धीवर आल्यावर त्यांना त्वरित दाखल करून पुढील उपचार करण्यात आले.

घटनेतून सीपीआर पद्धतीचे महत्त्व अधोरेखित करत लवकरच मोफत सीपीआर प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याचा मानस व्यक्त केला. इच्छुक स्वयंसेवकांनी नोंदणीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे,” असेही डॉ. चौधरी म्हणाले.

रविंद्र अरुण गुरव हे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असून तंत्रस्नेही शिक्षक म्हणून जिल्ह्यात प्रचलित आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. देवदूता सारखे धावून आलेले डॉक्टरांचे अभिनंदन करण्यात येत आहे.