पाणीपुरवठा, रस्ते, सुविधा आणि महिलांसाठी योजनांना प्राधान्य देणार असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
वाशीम: ज्या वेळी लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहतात त्या वेळी शिवसेनेचा विजय निश्चित असतो. वाशिम-मालेगाव नगरपंचायतीसह कारंजा नगरपरिषदेचा नवीन विकासाचा अध्याय आता लिहिला जाणार आहे. विकासाचे राजकारण नव्हे तर विकासाचे समाजकारण करायचे असून आता थेट अॅक्शन मोडवर काम होईल, असे शिवसेनेचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
मालेगाव येथील गुरांच्या बाजाराचे आधुनिकीकरण करून व्यापाराचे हायटेक केंद्र बनविण्यात येणार असल्याचे आश्वासन शिंदे यांनी मालेगावमध्ये झालेल्या सभेत दिले. वाशीम-मालेगाव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश खुरसडे, कारंजा नगरपरिषदेच्या उमेदवार वैशाली येळणे आणि इतर उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. हरनारायण मंगल कार्यालय परिसरात झालेल्या सभेला मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीसह लाडक्या भावांची उपस्थिती होती, त्यामुळे भगवा जनसमुदाय पाहून शिवसेनेची जोरदार लाट असल्याचे चित्र निर्माण झाले.
मालेगावमधील गुरांच्या बाजारात सध्या मूलभूत सोयींचा अभाव असून चिखल, पाणी आणि व्यवस्थेअभावी व्यापारास अडथळे येतात. या बाजाराचे आधुनिकीकरण करून जनावरांसाठी पक्के शेड, सुव्यवस्थित जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणार असून यामुळे नगरपालिकेचे उत्पन्न वाढेल आणि मालेगाव व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र बनेल, असे शिंदे म्हणाले.
पाणीपुरवठा, रस्ते आणि गटार यांसह मूलभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे सांगताना त्यांनी आधीच 65 कोटींचा पाणीपुरवठा प्रकल्प दिल्याची आठवण करून दिली. खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, कब्रस्तानासाठी जागा, मुलांसाठी उद्यान आणि मैदानाची उभारणी लवकरच करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महिलांसाठी सुरू असलेली ‘माझी लाडकी बहीण’ योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, महिलांना बचत गटांच्या माध्यमातून खेळते भांडवल देऊन आर्थिक सक्षम करण्याचे काम सुरू राहील, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
अनेक वर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांना कायदेशीर हक्क देण्यासाठी अतिक्रमणे नियमबद्ध करण्यासह घरकुल प्रकरणे निकाली काढण्यात येतील, तर तरुणांना रोजगार आणि उद्योगांसाठी शासकीय स्तरावर मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. सभेच्या शेवटी शिंदे यांनी, “दोन तारखेला धनुष्यबाणाचे बटन दाबा आणि मालेगाववर भगवा फडकवा” अशा शब्दांत समर्थकांना आवाहन करत भाषणाची सांगता केली.