‘मुरांबा’मध्ये मोठा ट्विस्ट! रमा-अक्षय अखेर एकत्र; प्रोमो पाहून चाहत्यांचा जल्लोष

मनोरंजन

मुंबई: पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याच्या असतात. त्यातील कलाकारही घरातीलच सदस्य असल्यासारखे वाटतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात चांगलं घडावं, अशीच प्रेक्षकांची अपेक्षा असते. मात्र कथानक रंजक ठेवण्यासाठी मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट आणले जातात. असाच एक मोठा ट्विस्ट आता स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘मुरांबा’ मालिकेत पाहायला मिळत आहे.

‘मुरांबा’ ही मालिका आणि त्यातील रमा-अक्षयची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. गेल्या वर्षभरापासून या दोघांच्या नात्यात अनेक चढ-उतार दाखवण्यात आले. मालिकेने लीप घेतल्यानंतर रमाचा अपघात, तिच्या जागी माहीची एंट्री आणि इरावतीने मुद्दाम दोघांना दूर ठेवण्याचा प्रयत्न—या सगळ्या घडामोडींमुळे कथानकाला वेगळी कलाटणी मिळाली होती.

सध्या मालिकेत साई आणि रमाचं लग्न होणार असल्याचं चित्र रंगवलं जात होतं. मात्र ऐनवेळी कथानकाने नाट्यमय वळण घेतलं आहे. रमा थेट लग्नाच्या मंडपातून अक्षयसमोर येते आणि दोघांच्या प्रेमाला पुन्हा नवा अध्याय मिळतो. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये रमा ट्राफिक जाम करत गाडीच्या टपावर चढून अक्षयला हाक मारताना दिसते. हा सीन पाहून चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

सोशल मीडियावर या प्रोमोला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. एका चाहत्याने लिहिलं, “खूप खूप सुंदर प्रोमो दाखवला आहे.” तर दुसऱ्याने ‘जा सिमरन जा…’चा संदर्भ देत, “जा रमा जा, तुझ्या अक्षयकडे,” अशी प्रतिक्रिया दिली. १४ फेब्रुवारीच्या पार्श्वभूमीवर प्रेमी युगुल एकत्र येणार याचा आनंद अनेकांनी व्यक्त केला आहे. “ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलाच,” अशीही एक प्रतिक्रिया पाहायला मिळाली. तर काहींनी, “शेवटी रमा-अक्षय एकत्र दाखवलं, काय ते कंटाळवाणं चालू होतं,” असे म्हणत समाधान व्यक्त केले.एकूणच, ‘मुरांबा’ मालिकेतील हा ट्विस्ट प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी ठरली असून, पुढील भागांमध्ये रमा-अक्षयच्या नात्याची नवी सुरुवात कशी रंगते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.