मुंबई: वडाळा–कासारवडवली मुंबई मेट्रो लाईन 4 (ग्रीन लाईन) प्रकल्पांतर्गत मुलुंड येथील एलबीएस रोडवर सुरू असलेल्या कामादरम्यान मेट्रोचा स्लॅब कोसळल्याची गंभीर घटना घडली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
सपकाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युती सरकारच्या कारभारातील कथित भ्रष्टाचारामुळेच अशा दुर्घटना घडत आहेत. “लोकवस्तीच्या भागात मेट्रोसारखी मोठी कामे सुरू असताना सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी का होत नाही? निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच, “तथाकथित विकास पुरुष” अशी उपमा देत सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी केली. “फक्त कंत्राटदारांवर कारवाई करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करू नये. जसे श्रेय घेता, तसेच जबाबदारीही घ्यायला शिकले पाहिजे,” असे ते म्हणाले.
सपकाळ यांनी पुढे मुंबई कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि समृद्धी महामार्ग या मोठ्या प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “हजारो-लाखो कोटी रुपये खर्च करूनही जर प्रकल्प जनतेसाठी जीवघेणे ठरत असतील, तर असा विकास कशासाठी?” असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, प्रशासनाकडून दुर्घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत असून, सुरक्षाविषयक बाबींचा सखोल आढावा घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांनीही या घटनेबाबत संताप व्यक्त केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.