इचलकरंजी: देशाच्या राजनैतिक शक्तीपीठांचा विचार केला तर पहिले शक्तीपीठ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे शक्तीपीठ म्हणजे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह आहेत, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. मोदी यांनी भारताला विकासाच्या नव्या उंचीवर नेले, तर अमित शाह यांनी देशाची सुरक्षा आणि सहकार क्षेत्राला नवी दिशा दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन तसेच जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या “कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना” या नामविस्तार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, संजय सावकारे, शिवेंद्रराजे भोसले, रवींद्र चव्हाण, माधुरी मिसाळ, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या बारा वर्षांत देशाला विकास आणि समृद्धीच्या नव्या उंचीवर नेले आहे. तर अमित शाह यांनी अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्याबरोबरच सहकार क्षेत्रात ऐतिहासिक बदल घडवून आणले आहेत. नक्षलवाद संपविण्याचा निर्धार त्यांनी केला असून देश, समाज आणि सहकार क्षेत्राच्या विकासासाठी ते अहोरात्र कार्यरत आहेत.
काँग्रेसच्या काळात सहकार क्षेत्र काही मोजक्या लोकांच्या हातात केंद्रित झाले होते. मात्र मोदी सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना करून त्याची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे दिल्यानंतर या क्षेत्रात मोठी क्रांती घडली, असा दावा शिंदे यांनी केला. सहकारी बँकांना सक्षम करण्यासाठी गृहकर्ज मर्यादा वाढविणे, वन टाइम सेटलमेंट, स्वतंत्र अंब्रेला ऑर्गनायझेशन आणि को-ऑपरेटिव्ह क्लिअरिंग हाऊस यांसारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्र ही देशातील साखर सहकार चळवळीची भूमी असून लाखो शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा कणा सहकारी साखर कारखाने आहेत. भारत विकसित राष्ट्र व्हायचा असेल तर सहकार चळवळ अधिक मजबूत झाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या कार्याचे कौतुक करताना शिंदे म्हणाले की, “माणसांच्या मनाला विणणारी बँक” ही बँकेची टॅगलाईन तिच्या कार्यपद्धतीचे उत्कृष्ट वर्णन करते. नव्याने उभारलेली प्रशासकीय इमारत आधुनिक आणि लोकाभिमुख सहकार व्यवस्थेचे नवे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महायुती सरकार शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्यासाठी कटिबद्ध असून राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकरी आणि लाडक्या बहिणींचा आहे, असेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.