आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

महाराष्ट्र

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी, आंदोलन करणाऱ्या तरुणांवर झालेल्या कथित कारवाईबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली.

मुंबईतील टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना लोंढे म्हणाले की, दिल्लीतील जंतरमंतरसह देशभरात लाखो तरुणांनी शांततापूर्ण आंदोलन केले. मात्र, आंदोलन दडपण्यासाठी लाठीहल्ला, पेलेट गनचा वापर आणि आंदोलकांशी गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलनकर्त्यांना देशद्रोही आणि पाकिस्तानधार्जीणे ठरवून बदनाम करण्याचाही प्रयत्न झाल्याचे त्यांनी म्हटले.

मोहन भागवत तरुणांशी संवाद साधत असताना, आधी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित कारवाईबद्दल मोदी-शाह यांनी माफी मागावी, अशी भूमिका लोंढे यांनी मांडली. “अन्यथा हा संवाद ढोंगीपणाचाच भाग ठरेल आणि तरुणाई त्यावर विश्वास ठेवणार नाही,” असा दावा त्यांनी केला.दरम्यान, पेलेट गन वापरण्याचा आदेश कोणी दिला, याची चौकशी करून केंद्र सरकारने संसदेत याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत