नागपूर: ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या देशासमोर यावी यासाठी होणाऱ्या जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करणे अत्यावश्यक असल्याचे मत काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते व ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने ओबीसी जनगणनेची घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष जनगणना प्रक्रियेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याने सरकारच्या भूमिकेबाबत गंभीर शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर येथे विदर्भातील ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत बोलताना वडेट्टीवार यांनी राज्यभर व्यापक जनआंदोलन उभारण्याची घोषणा केली. महाराष्ट्र स्तरावर लवकरच समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असून विदर्भातील ११ जिल्ह्यांत मंडल यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेद्वारे ओबीसी जनगणना, आरक्षण, शैक्षणिक संधी, आर्थिक विकास आणि सामाजिक न्याय या विषयांवर जनजागृती केली जाणार आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यभर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देऊन आंदोलनाची सुरुवात होणार असून, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात आमदार आणि खासदारांच्या घरांसमोर ढोल बजावून लोकप्रतिनिधींना ओबीसी प्रश्नांबाबत जागृत करण्याचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विदर्भातील प्रमुख ओबीसी नेत्यांच्या सहभागातून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
ओबीसी समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पीय तरतूद करावी, महाज्योती संस्थेला ६०० कोटी रुपयांचा निधी द्यावा, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी आणि शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी अधिक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
याशिवाय राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी द्यावी तसेच सर्व पात्र विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि ओबीसी नेतृत्वाने या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.बैठकीस सकल ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश कोर्राम, समन्वयक सदानंद इलमे, प्रभाकर वैरागडे यांच्यासह विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.