२१ ऑगस्ट ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा होणार; सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला राज्याचा गौरव

महाराष्ट्र

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला असून, जलसंधारण क्षेत्रातील सुधाकरराव नाईक यांच्या योगदानाचा गौरव करण्याचा उद्देश आहे.

मुख्यमंत्री म्हणून १९९१ ते १९९३ या काळात कार्यरत असताना सुधाकरराव नाईक यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना राबवत जलसंधारण, पाणलोट विकास, भूजल पुनर्भरण आणि लोकसहभागावर आधारित विकास मॉडेल राज्यासमोर मांडले. त्यांच्या कार्यकाळात स्वतंत्र मृद व जलसंधारण विभागाची स्थापना करण्यात आली तसेच माती नाला बांध, सलग समतल चर, नाला बंडिंग यांसारख्या लघु जलसंधारण कामांना मोठी चालना मिळाली.

मंत्री संजय राठोड यांनी सुधाकरराव नाईक यांच्या कार्याचा सन्मान व्हावा आणि जलसंधारणाबाबत जनजागृती वाढावी यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार आता दरवर्षी २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे.

शासन निर्णयानुसार, या दिवशी मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यालयांमध्ये सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला अभिवादन, मृद व जलसंधारणाची शपथ, जलसंधारण प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण, जलपूजन, श्रमदान, जनजागृती अभियान तसेच उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. हे सर्व कार्यक्रम विभागाच्या उपलब्ध निधीतून राबविण्यात येणार आहेत.

या निर्णयामुळे स्व. सुधाकरराव नाईक यांचा जलसंधारणाचा विचार नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना अधिक व्यापक स्वरूपात रुजण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत