‘माती जपा, पाणी वाचवा’; राज्यभर ‘महा वॉकेथॉन’चा जलसंधारणाचा जागर

महाराष्ट्र

मुंबई : ‘माती जपा, पाणी वाचवा आणि जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ या संदेशाने राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या **‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’**ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या जलसंधारण दिनाचे औचित्य साधून आयोजित या उपक्रमात राज्यातील सर्व ३५ जिल्ह्यांमधून दोन लाखांहून अधिक नागरिक सहभागी झाले.

मुंबईतील वरळी येथील सागरी किनारा रस्त्यालगतच्या प्रोमेनेड परिसरात राज्यस्तरीय वॉकेथॉनचा शुभारंभ झाला. स्व. सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जलपूजन, जल व मृदसंधारणाची शपथ घेऊन वॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली.

यावेळी विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, माजी क्रिकेटपटू इरफान पठाण, गायक संजू राठोड, अभिनेते पुष्कर श्रोत्री, जॅकी भगनानी, रजनीश दुग्गल आदी मान्यवर सहभागी झाले.

मंत्री संजय राठोड म्हणाले की, “माती आणि पाणी हे महाराष्ट्राच्या भवितव्याशी जोडलेले विषय आहेत. केवळ मंत्रालयात बैठका न घेता लोकांमध्ये जाऊन जलसंधारणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. महा वॉकेथॉनच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.”

स्व. सुधाकरराव नाईक यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या विचाराला लोकचळवळीचे स्वरूप दिले. त्यांच्या कार्याचा आदर्श घेत भविष्यातील पिढ्यांसाठी माती आणि पाण्याचे संवर्धन करण्यासाठी लोकसहभाग वाढविणे गरजेचे असल्याचे राठोड यांनी सांगितले. युवकांनीही या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी महा वॉकेथॉन हा माती वाचवा, पाणी जिरवा आणि जलसंधारणाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणारा अभिनव उपक्रम असल्याचे सांगितले. तर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत मुरवणे आणि मातीचे संवर्धन करणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद केले.

दरम्यान, तीन किलोमीटरच्या या वॉकेथॉनमध्ये मंत्री संजय राठोड यांच्यासह सचिन अहिर, इंद्रनील नाईक, जितेंद्र पापळकर आणि विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले. जलसुरक्षेचा संदेश देणाऱ्या गीतांचे सादरीकरण तसेच सहभागींसाठी बक्षीस वितरणही करण्यात आले.

राज्यातील ३५ जिल्ह्यांत एकाच वेळी झालेल्या या उपक्रमातून माती आणि पाणी संवर्धनाचा संदेश व्यापक लोकचळवळीत रूपांतरित करण्याचा संकल्प करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत