‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

महाराष्ट्र

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ यांच्याबाबत धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यावर गुरुवारी (३ सप्टेंबर) अत्यंत दुर्दैवी घटना घडली. अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन मुलांसह किल्ल्यावरील सुमारे १०० फूट उंच बुरुजावरून उडी घेतल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा मृत्यू झाला. अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी क्रांती हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसरी मुलगी वीरा गंभीर जखमी असून तिच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, अश्विनी पौळ यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

राष्ट्रीय कुस्तीपटू म्हणून गाजवले नाव

अश्विनी तानाजी मोहिते या विवाहानंतर अश्विनी मनोहर पौळ झाल्या. त्या धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील व्हंताळ गावच्या रहिवासी होत्या. राष्ट्रीय स्तरावरील विविध कुस्ती स्पर्धांमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते.

अश्विनी यांच्या कुस्ती कारकिर्दीत त्यांनी ५ सुवर्ण आणि ६ रौप्य पदके मिळवल्याची माहिती आहे. २००७ मध्ये तिरुवनंतपुरम येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर २००८ आणि २००९ मध्येही राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदकांची कमाई केली.त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळख मिळाली होती.

घरातूनच मिळाले कुस्तीचे बाळकडू

अश्विनी यांच्या कुटुंबातच कुस्तीची परंपरा होती. वडील, आई, भाऊ आणि बहीण हेही कुस्तीशी जोडलेले असल्याचे सांगितले जाते. मुलीने कुस्तीमध्ये नाव कमवावे, यासाठी त्यांच्या वडिलांनी घरातच सरावासाठी तालीम सुरू केली होती. याच वातावरणातून अश्विनी यांनी कुस्तीचे धडे घेत राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली.

महाराष्ट्र सुरक्षा दलातही होत्या कार्यरत

क्रीडा क्षेत्रासोबतच अश्विनी पौळ या मुंबईतील महाराष्ट्र सुरक्षा दलात (MSF) नोकरी करत होत्या. मात्र, पती मनोहर पौळ यांच्या सांगण्यावरून त्यांनी घटनेच्या चार ते पाच महिन्यांपूर्वी नोकरीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. मागील सुमारे तीन महिन्यांपासून त्या आपल्या तीन मुलांसह माहेरी राहत होत्या.

दरम्यान, माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. अश्विनी पौळ यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, हे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होणार आहे.दरम्यान, नळदुर्ग किल्ल्यावर घडलेल्या या घटनेमुळे क्रीडा क्षेत्रासह धाराशिव जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत