अजितदादांच्या शैलीतच सुनेत्रा पवारांचा अधिकाऱ्यांना इशारा; गुणवत्तेशी तडजोड सहन केली जाणार नाही

महाराष्ट्र

पुणे : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदासह पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे. गुरुवारी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पालकमंत्री म्हणून त्यांनी प्रथमच उपस्थिती लावली. या बैठकीत त्यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीचीच झलक दाखवत अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि ठोस सूचना दिल्या.

बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कामांची सद्यस्थिती, निधीचा वापर आणि प्रलंबित प्रकल्प याबाबत सुनेत्रा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. मंजूर कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करावीत, प्रत्येक प्रकल्पाचा दर्जा उत्कृष्ट आणि टिकाऊ असावा, तसेच पुढील वर्षाचे नियोजन प्राधान्यक्रम ठरवून काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीला खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार राहुल कुल, आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके, पुणे शहरातील सर्व आमदार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. काही लोकप्रतिनिधींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग नोंदवला.

अजित पवार हे विकासकामांच्या गुणवत्तेबाबत अत्यंत आग्रही म्हणून ओळखले जात होते. प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी करणे, त्रुटी आढळल्यास अधिकाऱ्यांना जाब विचारणे आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करणे ही त्यांची कार्यशैली होती. त्याच पद्धतीने सुनेत्रा पवार यांनीही अधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली.

“जिल्ह्याचा विकास गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण झाला पाहिजे. जनतेच्या अपेक्षा केंद्रस्थानी ठेवून पारदर्शक आणि परिणामकारक कामकाज झाले पाहिजे,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. गुणवत्तेशी तडजोड न करता विकासाला गती देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.