झाडांची छाटणी ठरली जीवावर बेतणारी! आडव्या दोरीने घेतला दुचाकीस्वाराचा बळी

क्राईम महाराष्ट्र

पुणे: कर्वेनगर परिसरात बुधवारी दुपारी झाडांच्या फांद्या तोडण्याच्या कामादरम्यान झालेल्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघात घडला. रस्त्यावर आडवी बांधलेली दोरी न दिसल्याने दुचाकीस्वाराच्या गळ्याला ती अडकून गंभीर दुखापत झाली. या घटनेत रामेश्वर अवतीकर (रा. कर्वेनगर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचा मित्र सुधीर लांडगे हाही जखमी झाला आहे.

ही घटना (ता. ११) दुपारी सुमारे दोनच्या सुमारास अलंकार पोलिस ठाण्याजवळील मेघराज गृहनिर्माण सोसायटीसमोर घडली. मेघराज सोसायटीत वाढलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू होते. यासाठी वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाकडून परवानगी घेण्यात आली होती. मात्र काम सुरू करण्यापूर्वी महापालिकेला पूर्वकल्पना देणे, सहाय्यक उद्यान अधीक्षक किंवा हॉल्टीकल्चर मिस्त्री यांच्या उपस्थितीत काम करणे तसेच रस्ता बंद करण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक होते. या नियमांचे पालन न केल्याचा आरोप सोसायटी व ठेकेदारावर होत आहे.

दुपारी रामेश्वर आणि सुधीर हे दुचाकीवरून मेघराज सोसायटीसमोरील रस्त्याने जात असताना त्यांना रस्त्यावर आडवी आलेली दोरी दिसली नाही. वेगात असलेल्या दुचाकीस्वार रामेश्वर यांच्या गळ्याला दोरी अडकली आणि घर्षणामुळे त्यांच्या गळ्याला गंभीर जखम झाली. दोघेही दुचाकीसह खाली पडले. रामेश्वर यांच्या गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ दोघांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात तपासणीदरम्यान रामेश्वर यांच्या गळ्यासह अन्ननलिकेलाही गंभीर इजा झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे यांनी रुग्णालयात भेट देत घटनेची माहिती घेतली.

“सोसायटीला झाडांच्या फांद्या तोडण्याची परवानगी दिली होती. मात्र नियमानुसार पूर्वसूचना देणे आणि पोलिसांकडून रस्ता बंद करण्याची परवानगी घेणे आवश्यक होते. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे,” असे सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे यांनी सांगितले.अलंकार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून निष्काळजीपणाबाबत जबाबदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

वृक्षछाटणीतील निष्काळजीपणा पुन्हा चर्चेत

शहरात दरवर्षी झाडे उन्मळून पडणे, फांद्या कोसळणे अशा घटना घडत असतात. काही ठिकाणी नागरिकांचा जीव गेला असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. धोकादायक झाडे आणि फांद्या काढताना सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक असतानाही अनेकदा ठेकेदारांकडून हलगर्जीपणा केला जातो. महापालिकेकडून परवानग्या आणि देखरेख याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.या घटनेत नियमांचे पालन झाले असते, तर तरुणाचा जीव धोक्यात येण्याची वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.