मुंबई: छोट्या पडद्यावरील मालिकांच्या टीआरपीच्या शर्यतीत सध्या चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. विशेषतः रात्री ९ वाजताच्या प्राइम स्लॉटसाठी आघाडीच्या वाहिन्यांमध्ये जोरदार स्पर्धा रंगली असून फेब्रुवारी महिन्यात ‘कमळी’ मालिकेने बाजी मारत सर्वाधिक टीआरपी मिळवला आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात उच्चांक गाठत ‘कमळी’ने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
याच पार्श्वभूमीवर स्टार प्रवाह वाहिनीने मोठा निर्णय घेतला आहे. प्राइम टाइममध्ये प्रसारित होणारी ‘नशीबवान’ मालिका आता वेळ बदलून दुपारच्या स्लॉटमध्ये दाखवली जाणार आहे. १६ फेब्रुवारीपासून ‘नशीबवान’ दुपारी २:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘नशीबवान’ ही मालिका गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुरू झाली होती. या मालिकेत आदिनाथ कोठारे, अजय पूरकर, नेहा नाईक, प्राजक्ता केळकर आणि सोनाली खरे यांसारखी दमदार स्टारकास्ट झळकत आहे. सुरुवातीला ही मालिका रात्री ९ वाजताच्या स्लॉटमध्ये आघाडी घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र ‘कमळी’ने दिलेल्या कडव्या स्पर्धेमुळे वाहिनीला वेळ बदलण्याचा निर्णय घ्यावा लागल्याची चर्चा आहे.
दरम्यान, दुपारी २:३० वाजताच्या स्लॉटमध्ये सध्या ‘शुभविवाह’ ही लोकप्रिय मालिका प्रसारित होत आहे. गेली तीन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या मालिकेत मधुरा देशपांडे, यशोमन आपटे आणि विशाखा सुभेदार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
आता ‘नशीबवान’ला या स्लॉटमध्ये हलवण्यात आल्यामुळे ‘शुभविवाह’ मालिका संपणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र याबाबत वाहिनी किंवा कलाकारांकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘शुभविवाह’चा पुढील प्रवास काय असेल, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
लवकरच स्टार प्रवाह कडून याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत टीआरपीच्या या शर्यतीत पुढे काय घडते, याकडे छोट्या पडद्यावरील रसिकांचे लक्ष लागले आहे.