गणपती मंडळाच्या सहकार्याने कवठे येमाई येथे भव्य संजय गांधी निराधार योजना शिबिर संपन्न

मुख्य बातम्या शिरूर तालुका

७६ लाभार्थ्यांचे अर्ज प्रक्रिया पूर्ण; शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळविण्याकडे मोठे पाऊल

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई गावात सामाजिक कार्याचा वसा जोपासणाऱ्या श्री गुरुदेवदत्त फ्रेंडशिप ग्रामविकास प्रतिष्ठान, कवठे या गणपती मंडळाने (दि. २) सप्टेंबर २०२५ रोजी एक भव्य संजय गांधी निराधार योजना शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या सामाजिक उपक्रमाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम, खेळांच्या स्पर्धा, महिलांसाठी अभिनव उपक्रम या गणपती मंडळाकडून घेण्यात येत आहे.

शिबिरामध्ये वृद्ध, निराधार महिला-पुरुष, विधवा तसेच अपंग व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी अर्ज भरून शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेतला.

या शिबिरात संजय गांधी निराधार योजना – निराधार व गरजू व्यक्तींसाठी जीवनावश्यक मदत,

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना – विधवा महिलांसाठी आर्थिक सहाय्य

वृध्दापकाळ पेन्शन योजना – ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आधार,राष्ट्रीय अपंग पेन्शन योजना – अपंग व्यक्तींना मासिक मदत, शासनाच्या योजनांसाठी अर्जांची नोंदणी करण्यात आली :

शिबिराच्या दिवशी एकूण ७६ लाभार्थ्यांचे अर्ज ऑन-द-स्पॉट प्रक्रिया करून पूर्ण करण्यात आले. हे या शिबिराचे मोठे यश ठरले.या उपक्रमासाठी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, नायब तहसीलदार सुवर्णा सांगळे-खरमाटे, मंडळाधिकारी विजय फलके, महसुल अधिकारी शलाका भालेराव यांनी विशेष सहकार्य करून उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शिबिरातील अर्ज प्रक्रिया तांत्रिक पातळीवर सुलभ व्हावी यासाठी तेजस काळे (मोरया कॉम्प्युटर, कवठे येमाई) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. श्री गुरुदेवदत्त फ्रेंडशिप ग्रामविकास प्रतिष्ठान, कवठे ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून समाजोपयोगी कार्य करीत आहे. गणेशोत्सव, आरोग्य शिबिरे, पर्यावरण संवर्धन आदी उपक्रमांबरोबरच शासनाच्या विविध योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम संस्थेमार्फत केले जाते.

या शिबिरामुळे निराधार, वृद्ध, विधवा व अपंग लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक जणांनी “आमच्यासारख्या गरजूंना गावातच अशा योजनांची संधी मिळणे म्हणजे मोठा दिलासा आहे,” असे समाधान व्यक्त केले.या शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. ग्रामीण भागात अशा योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे म्हणजे शासनाच्या कल्याणकारी योजनांचा उद्देश पूर्ण होण्यास हातभार लागल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.