शिरूर (अरुणकुमार मोटे): शहरातील रामलिंग रोडवरील प्रसिद्ध ‘सिरवी बंधू मिठाईवाले’ या स्वीट होम मधून विकत घेतलेल्या पावात आढळलेल्या घुशीच्या लेंडीच्या प्रकरणाने खळबळ उडवली असून, या प्रकरणात आता स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी अधिक कठोर पवित्रा घेतला आहे. खराब पाव विकणाऱ्या स्वीट होम वर कुठलीही कारवाई केली नसून पाव तयार करणारी बेकरी सील करण्यात आली आहे. स्वीटवर कारवाई न केल्यामुळे अन्नसुरक्षा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
केवळ बेकरी सील करून आणि परवाना रद्द करून अन्न सुरक्षा प्रशासन शांत झाले असले तरी, “हा प्रकार नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखा असून, या बेकरीच्या व स्वीट होमच्या मालकांवर कलम 272, 273 भा.दं.वि. (भेसळयुक्त आणि आरोग्यास हानीकारक अन्नपदार्थ विक्री) अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी,” अशी मागणी आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे.
“ही एक वेळची चूक नसून ही बेकरी कित्येक दिवसांपासून अस्वच्छतेकडे दुर्लक्ष करत होती. जर त्या पावात एखाद्या लहान मुलाने किंवा आजारी व्यक्तीने घाण गिळली असती, तर काय परिणाम झाले असते याची कल्पनाही नको. प्रशासनाने ही केवळ ‘कार्यवाहीची नाटकबाजी’ थांबवून, गुन्हे दाखल करावेत,” असे रोषाने प्रतिपादन संतप्त नागरिक, ग्राहक संघटना आणि आरोग्यप्रेमी करत आहेत.
‘फूड क्राइम’चा गुन्हा नोंदवा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी……
“ही घटना म्हणजे अन्न सुरक्षा कायद्यांचा सर्रास भंग आहे. संबंधित बेकरीवर केवळ आर्थिक शिक्षा न करता, गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई व्हावी. बेकरीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जबाबदारीचे स्पष्टीकरणही घ्यावे.”शिरूर तालुक्यातील अनेक बेकऱ्या आणि हॉटेल्समधील अन्न प्रक्रिया, साठवणूक आणि साफसफाईची स्थिती अत्यंत भीषण आहे. “आज ‘सिरवी बंधू’व बेकरीवाले सापडले, उद्या दुसरे कोण? प्रशासनाने संपूर्ण तालुक्यात अन्न सुरक्षेची मोहीम हाती घ्यावी,” अशीही जोरदार मागणी आहे.
या प्रकरणी अन्न सुरक्षा विभागाचे निरीक्षक लक्ष्मीकांत सावळे यांनी संबंधित बेकरीवर कारवाई करून सील केल्याचे जरी नमूद केले असले, तरी “हे अपुरे आहे,” अशी नागरिकांची भूमिका आहे.
“घटनेच्या गंभीरतेनुसार एफआयआर नोंदवून, यास्वीट होम व बेकरीचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि अटक करावी,” अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे.
संतप्त नागरिकांनी जर पुढील २४ तासांत संबंधितांवर गुन्हा दाखल न झाला, तर शिरूर शहरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.“हे आता आरोग्याचे नव्हे, तर जीवितहानीचे प्रकरण आहे. अशा स्वीट होम व .बेकऱ्यांना अभय मिळाले, तर उद्याचा मृत्यू सुद्धा अन्नातूनच येईल,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे.