अन्न नेहमी ताजे व गरम जेवावे. असे अन्न स्वादिष्ट तर असतेच शिवाय लवकर व चांगले पचते. फारच थंड वा फारच गरम अन्न मात्र कधीच खाऊ नये.
अगदी कोरडे अन्न वा तेलातुपाने नुसते माखलेले अन्न खाऊ नये. अगदी कोरडे अन्न म्हणजे रुक्ष अन्न खावयास तर त्रास होतोच पण पचावयास देखील त्रास होतो.
अन्नाचे प्रमाण भूक व पचनशक्ती यांच्या अनुमानाने योग्य तेवढे जर ठेवले तर त्रिदोषांना कोठेही न बिघडवता तीनही दोषांचे योग्य असे पोषण करण्यास ते सक्षम ठरते.
भूक लागल्या शिवाय जेवू नये. भूक लागणे हे आधीचे जेवण पचले आहे असे समजण्याचे साधन आहे.
आधी खाल्लेले अन्न नीट पचल्या खेरीज जेवू नये, अन्यथा अन्नपाचक रसांना, आतड्यांना ताण येतो व पचनसंस्था बिघडते.
दोन परस्पर विरोधी अशा प्रकारचे अन्न एकाच वेळी व एकामागून एक असे खाऊ नये, अशाने रोगाला आमंत्रण मिळते.
अस्वच्छ जागी बसून जेवू नये, याने जंतुसंसर्ग वाढतो.
खूप भराभर जेवू नये. अशाने ठसका लागण्याचा संभव निर्माण होतो व अन्नाचा तिटकारा वाटण्याची शक्यता निर्माण होते.
अति सावकाश रेंगाळत जेवू नये, असे केल्यास जेवण तर गार होतेच शिवाय पचन मंदावते, भूक नीट भागत नाही व जेवणाचे समाधान होत नाही.
जेवताना टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप, व्हिडीओ गेम्स हे काटेकोरपणे टाळावे. यामुळे जेवणात लक्ष राहत नाही.
जेवणासारखी अत्यंत महत्वाची गोष्ट, पूर्णपणे लक्ष देऊन स्वतःसाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार करून प्रसन्न मनाने भोजन करावे.
(सोशल मीडियावरून साभार)