अंघोळीच्या पाण्यात ‘हा’ घटक असेल तर पडेल टक्कल, वेळीच व्हा सावध…

आरोग्य

आजकाल प्रत्येक जण केस गळणे, पांढरे केस, केसात कोंडा यासह इतर समस्यांनी त्रस्त आहे. महिलांसोबतच पुरुष आणि लहान मुलांनाही केसगळतीचा सामना करावा लागत आहे. पाण्यातील वाढलेले खनिजांचे प्रमाण, विशेषतः सल्फेट आणि टीडीएस (एकूण विरघळलेले घन पदार्थ), केसगळतीचे प्रमुख कारण बनत आहे. बोअरवेल किंवा हार्ड वॉटरमुळे केस गळण्याचे प्रमाण वाढल्याने अनेकांना आरोग्याचा त्रास होत आहे.

पाण्याची गुणवत्ता केसांच्या आरोग्यावर थेट परिणाम करते. त्यामुळे योग्य पाण्याचा वापर करून केसगळती थांबवणे आवश्यक आहे. सल्फेट-फ्री उत्पादने वापरा, टाळूची स्वच्छता आणि पोषणाकडे लक्ष द्या, शुद्ध आणि मऊ पाणी वापरा, केस गळती वाढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

केसगळतीची कारणे कोणती…

केसगळती ही अनेक घटकांवर अवलंबून असते, जसे की आहार, जीवनशैली, आनुवंशिकता, हार्मोनल बदल, ताणतणाव अशा कारणांमुळे केसगळती होते. पाण्याची गुणवत्ता देखील केसगळतीवर परिणाम करू शकते. तरुणपणातच केस गळत असल्याने अनेकांची डोकेदुखी वाढली आहे.

टीडीएस किती हवा…

केसांसाठी वापरण्यायोग्य पाण्यात टीडीएस २०० पीपीएमच्या आत असावा, ३०० पीपीएमपेक्षा जास्त टीडीएस असलेले पाणी त्वचेला कोरडे करू शकते आणि खाज सुटण्याची समस्या उद्भवू शकते.

(सोशल मीडियावरून साभार)