घड्याळ बघूनच जेवणं गरजेचं नाही, पण १ नियम मोडला तर मिळेल ५ आजारांना निमंत्रण

आरोग्य

सध्याच्या धावपळीच्या आणि बिझी लाईफस्टाईलमध्ये, अनेकदा जेवणाची वेळ चुकते, कधी उशिरा जेवण होते तर कधी जेवणच स्किप केले जाते. कामाचा ताण, बदललेले डेली रुटीन किंवा आळस यामुळे नेहमीच्या वेळेवर जेवण न करणे ही सवय अनेकांच्या लाईफस्टाईलचा एक महत्वाचा भागच बनली आहे. मात्र ही सवय आरोग्यासाठी किती घातक ठरू शकते, याची जाणीव फारच कमी लोकांना असते. संपूर्ण दिवसभर कामाच्या पसाऱ्यात जेवणाची वेळ केव्हा निघून जाते, हे आपल्याला समजतही नाही. काही लोक सकाळी घाईत नाश्ता न करताच कामासाठी निघतात, तर काही रात्री उशिरापर्यंत जेवण करणे टाळतात.

जेवणाची कोणतीही एक निश्चित वेळ नसणे ही केवळ एक वाईट सवय नसून, ती आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. डॉक्टरांच्या मते, दीर्घकाळ अवेळी जेवल्यामुळे शरीराची चयापचय क्रिया बिघडते आणि पोटाचे विकार, थकवा, वजन वाढ, हार्मोन्सचे असंतुलन यांसारख्या समस्या तर दिसतातच, पण दीर्घकाळ ही सवय सुरू राहिल्यास ५ गंभीर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, ज्या तुमच्या डेली रुटीनवर मोठा परिणाम करू शकतात. जेवणाच्या चुकीच्या वेळा कशाप्रकारे तुमच्या शरीराला आतून पोखरू शकतात आणि कोणत्या आजारांना निमंत्रण देऊ शकतात ते पाहूयात…

दररोज जेवणाच्या योग्य वेळा न पाळल्यास नेमकं काय होत 

हेड क्लिनिकल न्यूट्रिशन डॉ. दीप्ती खटूजा सांगतात की, शरीर एका ‘बायोलॉजिकल क्लॉक’वर चालते. ज्याप्रमाणे झोपण्याची आणि उठण्याची एक वेळ असते, त्याचप्रमाणे शरीराला जेवणाचीही एक ठराविक दिनचर्या आवश्यक असते. जेव्हा आपण दररोज वेगवेगळ्या वेळी जेवतो, तेव्हा शरीराला हेच समजत नाही की पचनासाठी कधी तयार व्हायचे आहे आणि कधी आराम करायचा आहे. हीच गडबड हळूहळू हार्मोनल असंतुलनाचे कारण बनते.

शरीराचे हार्मोन्स आणि जेवणाची वेळ… 

आपल्या शरीरात असे अनेक हार्मोन्स असतात जे भूक, पचन, झोप आणि ऊर्जा नियंत्रित करतात. जसे की

१) इन्सुलिन: हे शरीरातील ब्लड शुगर नियंत्रित करते.

२) कोर्टिसोल: हे तणाव आणि ऊर्जेशी संबंधित हार्मोन आहे.

३) मेलाटोनिन: याला झोपेचे हार्मोन म्हटले जाते.

४) घ्रेलिन आणि लेप्टिन: हे हार्मोन्स आपल्याला भूक लागल्याचा किंवा पोट भरल्याचा संकेत देतात.

जेव्हा जेवणाची वेळ दररोज बदलत राहते, तेव्हा हे हार्मोन्स गोंधळतात. याचा परिणाम असा होतो की, कधी खूप जास्त भूक लागते, तर कधी अजिबात लागत नाही; कधी सतत थकवा जाणवतो, तर कधी झोप येत नाही.

जेवणाची वेळ निश्चित नसेल, तर होऊ शकतात हे ५ आजार… 

दीर्घकाळ अवेळी जेवण्याच्या सवयीमुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

१) पचनाशी संबंधित समस्या 

जेव्हा दररोज वेगवेगळ्या वेळी जेवण केले जाते, तेव्हा आपली पचनसंस्था योग्य रितीने काम करू शकत नाही. यामुळे गॅस, ॲसिडिटी अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू लागतात. अनेक लोकांना बराच वेळ उपाशी राहिल्यानंतर अचानक जास्त जेवल्यामुळे पोटात जडपणा आणि अस्वस्थता जाणवते.

2) वजन वाढणे किंवा अचानक वजन कमी होणे 

वेळेवर न जेवल्यामुळे मेटाबॉलिज्म बिघडते. कधी कधी खूप वेळ उपाशी राहिल्यामुळे शरीर ‘स्टोरेज मोड’मध्ये जाते आणि जास्त चरबी साठवू लागते. तर दुसरीकडे, काही लोकांची भूक पूर्णपणे मरते आणि त्यांचे वजन वेगाने कमी होऊ लागते. या दोन्ही स्थिती आरोग्यासाठी चांगल्या नाहीत.

३) डायबिटीजचा धोका 

अनियमित जेवणामुळे इन्सुलिन हार्मोनवर वाईट परिणाम होतो. ब्लड शुगर लेवल वारंवार वर – खाली झाल्यामुळे दीर्घकाळात ‘टाइप-२ डायबिटीज’चा धोका वाढतो.

४) हार्मोनल असंतुलन आणि थकवा 

जेवणाची योग्य वेळ निश्चित नसल्यामुळे स्ट्रेस हार्मोन ‘कोर्टिसोल’चे प्रमाण वाढू शकते. यामुळे सतत थकवा, चिडचिडेपणा, अस्वस्थता आणि एकाग्रतेचा अभाव जाणवतो. महिलांमध्ये यामुळे मासिक पाळी अनियमित होणे किंवा PCOD सारख्या समस्या उद्भवू शकतात.

५) झोप आणि मानसिक आरोग्यावर परिणाम 

रात्री उशिरा किंवा वेगवेगळ्या वेळी जेवण केल्याने झोपेचे हार्मोन ‘मेलाटोनिन’ प्रभावित होते. यामुळे नीट झोप न लागणे, सकाळी उठल्यावर जडपणा जाणवणे आणि कालांतराने चिंता किंवा नैराश्यासारख्या मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात.

(सोशल मीडियावरून साभार)