घरातला शाम्पू संपल्यावर तो लगेच आपण्याऐवजी आपण साबणाने केस धुतो. अर्थात सगळेच असं करत नाहीत मात्र अनेक जण करतात. साबणाने केस धुणे योग्य आहे की अयोग्य हे जाणून घ्या. साबणात असलेले घटक हे त्वचेला अनुसरुन असतात.
डोक्याची त्वचा त्यावरील केस आणि शरीराची त्वचा जरा वेगळी असते. दोन्हीला विविध प्रकारचे पोषण लागते. जसे की साबणात जास्त अल्कलाइन पातळी (pH)असते. त्वचेसाठी ही पातळी चालते. पण केसांसाठी ते आरोग्यदायी ठरत नाही. आपल्या केसांचा नैसर्गिक pH किंचित आम्लीय असतो. ज्यामुळे केसांचा बाहेरचा थर म्हणजेच क्युटिकल व्यवस्थित बंद राहते आणि केस मऊ राहतात आणि सुंदर दिसतात. परंतु साबणामुळे हा pH स्तर बिघडतो आणि क्युटिकल उघडे पडतात. यामुळे केस कोरडे, राठ होतात. साबण लावल्यावर केस पटकन तुटतात.
साबणात असलेले काही कठोर क्लिन्झर्स केसांतील नैसर्गिक तेल पटकन काढून टाकतात. तेल काढतात म्हणजे चांगलेच आहे असे अनेकांना वाटते मात्र हे तेल म्हणजे आपल्या केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर सारखे काम करते. ते तेल कम झाल्यावर केस पटकन गुंततात. दीर्घकाळ अशी परिस्थिती राहिली तर तुटण्याबरोबरच केसांच्या मुळांवरही ताण येतो. ज्यामुळे केस गळती वाढण्याची शक्यता असते. केस गळण्यामागे हार्मोनल बदल, पोषणाची कमतरता, आजारपण किंवा ताणतणाव ही कारणे तर असतातच मात्र साबणाचा वापर करणे हे ही एक कारण ठरु शकते. साबणाचा परिणाम जास्त करून केसांच्या गुणवत्तेवर होतो. केस कोरडे पडतात.
केस धुण्यासाठी शाम्पू सगळ्यांना आवडतोच असे नाही. अशा वेळी घरी मिश्रणे तयार करा. त्याने केस धुवा. शिकेकाईचा वापर करु शकता. त्यामुळे केस गळायचेही थांबतात तसेच नवीन केस येतातही. मात्र शाम्पू नाही म्हणून साबण वापरणे योग्य नाही. जी वस्तू ज्या कामासाठी तयार केली जाते ती त्याच कामासाठी वापरावी हा साधा नियम साबणालाही लागू पडतो. साबणामुळे केसांने संपूर्ण आरोग्य खराब होते असे नाही मात्र केस कोरडे होऊन राठ नक्की होतात. त्यामुळे साबणाने केस धुणे टाळा.
(सोशल मीडियावरून साभार)