मुंबई : पंतप्रधान Narendra Modi यांनी देशातील जनतेला पेट्रोल-डिझेल, सोने खरेदी, खतांचा वापर आणि खाद्यतेलाच्या वापरावर केलेला उपदेश म्हणजे देश चालवण्यात ते सपशेल अपयशी ठरल्याचे द्योतक असल्याची घणाघाती टीका Harshvardhan Sapkal यांनी केली आहे. “जनतेनेच सतत त्याग करायचा आणि मोदी फक्त कॅमेऱ्यासमोर भाषण देत फिरणार का?” असा संतप्त सवाल करत “राष्ट्रहितासाठी नरेंद्र मोदी यांनीच वानप्रस्थाश्रमाकडे मार्गस्थ व्हावे, ही १४० कोटी जनतेची भावना आहे,” असा हल्लाबोल त्यांनी केला.
सपकाळ म्हणाले की, संभाव्य आर्थिक संकटासाठी जगातील अनेक देश नियोजन आणि तयारी करत असताना मोदी सरकार आणि भाजप निवडणुका, जाहिराती, धर्मांधता आणि द्वेषाच्या राजकारणात गुंतले होते. “नरेंद्र मोदी यांच्या निष्काळजी, अहंकारी आणि लहरी कारभाराची मोठी किंमत देशातील नागरिकांना मोजावी लागत आहे,” असे ते म्हणाले.
देशात इंधन आणि एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सोने-चांदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, असा आरोपही सपकाळ यांनी केला. “निवडणुका जिंकण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी करण्यात आली आणि आता जनतेलाच त्यागाचे उपदेश दिले जात आहेत. स्वतः मात्र ४०-५० गाड्यांच्या ताफ्यासह फिरतात,” अशी टीकाही त्यांनी केली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांनी मार्च महिन्यात देशासमोरील संभाव्य धोक्याचा इशारा दिला होता, मात्र सत्तेच्या अहंकारात बुडालेल्या मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप करत सपकाळ म्हणाले की, “कोविड काळात लोक ऑक्सिजनअभावी मरत असताना टाळ्या-थाळ्या वाजवण्याचे आवाहन करण्यात येत होते. नोटबंदी, जीएसटी आणि कोविड संकटानंतर आता देशावर आणखी मोठे संकट आले असून त्याला मोदी सरकारच जबाबदार आहे.