फडणवीसांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कार द्यावा; मोदी सरकारच्या दाव्यांवर सपकाळांचा हल्लाबोल

महाराष्ट्र

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला पाहिजे, असा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विविध विधानांवर जोरदार टीका केली.

देशातील गरिबी निर्मूलन झाल्याचा दावा करताना मोदी सरकारकडून ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य दिले जात असल्याचा विसर मुख्यमंत्री फडणवीसांना पडला आहे, असा टोला सपकाळ यांनी लगावला. गरिबी संपली असेल तर रेशनवरील हे लाभार्थी कोण आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेला दावा धादांत खोटा असल्याचे सांगत सपकाळ म्हणाले की, स्वामीनाथन समितीची स्थापना काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात झाली होती. मात्र, केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर मोदी सरकारने आयोगाच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केले. आजही कांदा, सोयाबीन, कापूस, तूर आणि हरभरा यांसारख्या पिकांना शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाचा मोठा गाजावाजा केला जात असला तरी या काळातील कामगिरीची श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणीही सपकाळ यांनी केली. तसेच बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांबाबत सरकारने नेमकी काय कारवाई केली याची माहितीही जनतेसमोर मांडावी, असे ते म्हणाले.

खरीप हंगामासाठी सरकारने सर्व तयारी केल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावर टीका करताना सपकाळ यांनी राज्यात बियाणे टंचाई, खतांच्या लिंकिंगमुळे शेतकऱ्यांची होणारी अडवणूक आणि शेती क्षेत्रातील गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधले. राज्यातील वास्तव परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांना नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

फडणवीस वेशांतर करून जनतेत जात नाहीत, तर इतर पक्ष फोडण्यासाठी जातात, असा उपरोधिक टोला लगावत त्यांनी राज्य सरकारला ‘आंधळे, बहिरे आणि मुके’ सरकार असे संबोधले.

काँग्रेस हा डुबता पक्ष असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानालाही सपकाळ यांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेस हा देशाचा डीएनए असून भाजपाला खरे आव्हान देणारा एकमेव पक्ष काँग्रेसच आहे, असे ते म्हणाले. २०१४ मध्ये काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करणाऱ्या भाजपामध्ये आज मोठ्या प्रमाणावर काँग्रेसमधून गेलेले नेते आहेत, असा दावा करत त्यांनी भाजपाला मित्रपक्ष गिळणारी ‘चेटकीण’ अशी उपमा दिली.या पत्रकार परिषदेला नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण, काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी आणि हनुमंत पवार उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत