मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI) परीक्षेतील प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. बांद्र्यातील आर. डी. नॅशनल कॉलेज येथे 15 एप्रिल रोजी उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अ.भा.वि.प.च्या मते, तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच बाहेर येणे ही केवळ अनियमितता नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारी गंभीर बाब आहे. या घटनेमुळे संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत झाल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेष म्हणजे, प्रकरण समोर येऊन अनेक दिवस उलटूनही अद्याप ठोस गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही किंवा पारदर्शक चौकशीचा अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. उलट, काही निवडक विद्यार्थ्यांवर कारवाई करून मूळ जबाबदार यंत्रणेला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
अ.भा.वि.प.ने प्रशासनासमोर पुढील मागण्या ठेवल्या आहेत:
संबंधित सर्व जबाबदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत
परीक्षा केंद्रातील प्रमुख अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करावे
संबंधित विषयांच्या परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा जाहीर करावी
स्वतंत्र व पारदर्शक चौकशी समिती स्थापन करावी
दरम्यान, अ.भा.वि.प. मुंबई महानगर मंत्री प्रशांत माळी यांनी सांगितले की, या प्रकरणात सहा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असली तरी महाविद्यालय प्रशासन व विद्यापीठ परीक्षा विभागाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय आहे. त्यांनी पुढे इशारा दिला की, संशयितांवर त्वरीत गुन्हे दाखल न झाल्यास आणि जबाबदारी निश्चित न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.तसेच, परीक्षा नियंत्रक उत्तर देण्यास असमर्थ ठरत असतील तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.