नवी दिल्ली : यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात लाल किल्ल्यावर ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून प्रथमच ‘वंदे मातरम्’चे गायन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकावून देशाला संबोधित केले जाणार आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, यंदा ‘वंदे मातरम्’च्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य सोहळ्यात प्रथमच लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ‘वंदे मातरम्’ गायले जाणार असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे मुख्य आकर्षण ‘युवाशक्ती’ असणार आहे. 2047 पर्यंत भारताला ‘विकसित भारत’ बनवण्याच्या प्रवासात देशातील तरुणांची भूमिका आणि योगदान यावर विशेष भर दिला जाणार आहे.
‘वंदे मातरम्’ला कायदेशीर संरक्षण
संसदेने नुकतेच ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक’ मंजूर केले आहे. या दुरुस्तीमुळे ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्या कृत्यांपासून त्याला कायदेशीर संरक्षण मिळणार असून, त्याला राष्ट्रगीतासारखा कायदेशीर दर्जा देण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
या विधेयकावर लोकसभेत राजकीय चर्चाही रंगली. द्रमुकने या दुरुस्तीला विरोध करत, सरकार राष्ट्रगीताचा वापर देशात फूट पाडण्यासाठी करत असल्याचा आरोप केला. दुसरीकडे, भाजपने विधेयकाचे समर्थन करत, नागरिकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय ‘वंदे मातरम्’चा आदर करता यावा, यासाठी ही दुरुस्ती आवश्यक असल्याचे म्हटले आहे.