पुण्यात दादांच्या श्रद्धांजली वेळी रुपाली चाकणकर भावूक म्हणाल्या…

महाराष्ट्र

पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असून, या घटनेने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थक अद्यापही या धक्क्यातून सावरलेले नाहीत.या घटनेनंतर पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित श्रद्धांजली सभेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अजित पवारांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्या बोलताना भावूक झाल्या.

‘सभागृह तेच, गर्दी तीच; पण माणूस तो नाही’

रुपाली चाकणकर म्हणाल्या,“ज्या बालगंधर्व सभागृहात आज आपण दादांना श्रद्धांजली वाहतोय, त्याच सभागृहात दादांचे अनेक कार्यक्रम, योजनांची उद्घाटने, मेळावे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा झाला होता. इतकंच नाही तर या सभागृहाच्या पुनर्विकासासाठी लागणारा संपूर्ण निधी देण्याची तयारी दादांनी स्वतः व्यक्त केली होती. आज सभागृह तेच आहे, गर्दी तीच आहे, माणसंही तीच आहेत; पण तो माणूस आज आपल्यात नाही.”

‘माझ्याविरोधात तक्रार आली तरी गुन्हा दाखल करा’

आपल्या राजकीय प्रवासाबाबत बोलताना चाकणकर यांनी सांगितले की,“2002 मध्ये गाव समाविष्ट झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीत दादांनी माझ्या सासूबाई रुक्मिणी चाकणकर यांना उमेदवारी दिली. त्यानंतर आमचा दादांसोबतचा प्रवास सुरू झाला. 2009 मध्ये सुप्रिया सुळेंच्या लोकसभा निवडणुकीवेळी दादांनी मला थेट फोन करून महिलांच्या बचत गटांना कामाला लावण्याची जबाबदारी दिली. खरं तर तेव्हाच माझ्या राजकारणाची सुरुवात झाली.”

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर दादांनी दिलेल्या सूचनांचा उल्लेख करत त्या म्हणाल्या,“दादा स्पष्ट सांगायचे – तक्रारदार कोण आहे, पक्ष कोणता आहे हे बघू नकोस. फक्त तक्रार खरी आहे का ते बघ. अगदी माझ्याविरोधात तक्रार आली तरी माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची नोटीस दे.”

महिला आयोगाला बळ देणारा नेता

रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या कामकाजासंदर्भात अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयांची आठवण करून दिली.“आयोगाकडे ना पुरेसा स्टाफ होता, ना कार्यालय, ना विभाग. मी दादांकडे ही अडचण मांडली. अवघ्या तीन दिवसांत सकाळी साडेसात वाजता मंत्रालयात बैठक बोलावून त्यांनी आकृतीबंध, कर्मचाऱ्यांच्या सुविधा आणि टीडीओ मंजूर करून दिला. तीस वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न दादांनी चार वर्षांत मार्गी लावला,” असं त्या म्हणाल्या.

‘टीका सहन करायला शिक’ – दादांचा सल्ला

एका आंदोलनाच्या काळातील आठवण सांगताना त्या म्हणाल्या,“माझ्या घरासमोर आणि कार्यालयासमोर आंदोलन झालं तेव्हा दादांचा फोन आला. ते म्हणाले, ‘राजकारणात यश मिळू लागलं की टीका वाढते. ती सहन करायला शिक. उत्तर देऊ नकोस.’ त्या दिवसानंतर मी कधीही वैयक्तिक टीका केली नाही.”

‘काटेवाडीच्या मातीतून महाराष्ट्राच्या पटलावर’

शेवटी बोलताना चाकणकर म्हणाल्या,“काटेवाडीच्या मातीतून येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारा हा माणूस होता. तो कामाचा, सर्वसामान्यांमधला नेता होता. दादांच्या निधनाने प्रत्येकालाच आपल्या घरातला माणूस गेल्यासारखं वाटत आहे.”