जेजुरी: जेजुरी देवस्थानच्या प्रगती व सर्वांगीण विकासासाठी राज्य स्तरावर अनेक बैठका घेण्यात आल्या असून, श्रद्धेला धक्का न लावता सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात आला आहे, असे प्रतिपादन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
जेजुरी येथे श्री खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी श्री खंडोबाची विधिवत पूजा करून राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी तसेच महायुती सरकारच्या माध्यमातून जनहिताची कामे अधिक वेगाने पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली. देवस्थानचे विश्वस्त अॅड. विश्वास पानसे यांनी शाल, श्रीफळ आणि खंडोबाची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. कोविड काळात घडशी समाजाला दिलेल्या मदतीबद्दल घडशी समाजाच्यावतीनेही त्यांचा गौरव करण्यात आला.
डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, जेजुरीतील मुरळी प्रथा बंद करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. धर्म आणि परंपरेचा आदर राखत समाजसुधारणा साध्य होऊ शकते, हे या परिवर्तनातून सिद्ध झाले आहे. समाजातील विविध घटकांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
जेजुरीतील भंडाऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हळदीबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी सेंद्रिय हळदीच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. रासायनिक व बनावट हळदीमुळे भाविकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून मंदिराच्या ऐतिहासिक वास्तूलाही नुकसान पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सेंद्रिय हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून शुद्ध हळद उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठी त्यांनी श्री मार्तंड देवसंस्थानला वैयक्तिकरित्या २१ हजार रुपयांची देणगी धनादेशाद्वारे दिली.
देवस्थानच्या जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी जेजुरीच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. लाखो भाविकांसाठी आधुनिक सुविधांनी युक्त भक्तनिवास उभारण्याची गरज असून, यासाठी स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे पुढाकार घ्यावा, असे त्या म्हणाल्या.
वाराणसीच्या धर्तीवर जेजुरीमध्ये धार्मिक पर्यटनाला चालना देणारा कॉरिडॉर विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत, विकासकामांमध्ये स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि विश्वास हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी अधोरेखित केले.