बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर!

महाराष्ट्र

इंग्रजी विषयाच्या ‘त्या’ प्रश्नाला सरसकट मिळणार ६ गुण…

औरंगाबाद: इयत्ता बारावीच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरमध्ये प्रश्नांऐवजी पर्यवेक्षकांना दिलेल्या पेपर तपासण्याच्या सूचना छापण्यात आल्या होत्या. अखेर बोर्डाला चूक लक्षात आली असून, सर्वच विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांचे सरसकट सहा गुण देण्याची भूमिका पुणे बोर्डाने घेतली आहे.

बारावी बोर्डाच्या इंग्रजी पेपरमधील तीन प्रश्न चुकीचे होते. त्यामुळे पहिलाच पेपर देताना विद्यार्थी संभ्रमात सापडले होते. त्या प्रश्नांचे नेमके काय उत्तर लिहावे? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा होता. बहुतेक विद्यार्थ्यांनी ही बाब पर्यवेक्षकाच्या निदर्शनास आणून दिली. काहींनी आहे तशाच सूचना उत्तरपत्रिकेत लिहिल्याचेही सांगण्यात आले.

इंग्रजी पेपरमधील पान नं. १० मध्ये हा प्रकार पाहायला मिळाला. प्रश्न क्र. ए- ३ इंग्रजी कवितेवर आधारित हवा होता; पण त्याजागी तपासणाऱ्याला सूचना छापून आली होती. ए- ४ ला कवितेवर आधारित प्रश्न अपेक्षित असताना त्याऐवजी उत्तरच छापण्यात आले होते. तर ए- ५ हा प्रश्नदेखील २ गुणांचा होता आणि येथे देखील प्रश्नांऐवजी तपासणाऱ्याला दिलेल्या सूचना छापल्या होत्या. या तिन्ही प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांनी नेमकं करायचं काय, हा प्रश्न दिलेला नाही.

तसेच हे तिन्ही प्रश्न प्रत्येकी २ गुणांसाठी विचारण्यात आले होते. त्यामुळे बहुतेक विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवलाच नाही. दरम्यान, प्रचलित पद्धतीप्रमाणे इंग्रजीचे विषयतज्ज्ञ व सर्व विभागीय मंडळाचे प्रमुख नियामक यांच्यासमवेत संयुक्त सभा झाल्यावर सरसकट गुण देण्याचा अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.