पुणे: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या ११ दिवसांच्या भीषण युद्धाची झळ आता सामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचू लागली आहे. आखाती देशांमध्ये युद्धाची स्थिती गंभीर बनल्याने तेथून भारताला होणारा खनिज तेल (क्रूड ऑइल) आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. परिणामी महाराष्ट्रासह देशभरात घरगुती गॅस, नैसर्गिक वायू तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे.
पुढील काही दिवस युद्ध सुरूच राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनीही सरकारवर टीका सुरू केली आहे. गॅस टंचाईचा प्रश्न तात्काळ सोडवावा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारला दिला आहे.
या संदर्भात बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतातील सामान्य नागरिकांवर होत आहे. मोठ्या प्रमाणात गॅसची टंचाई निर्माण झाली असून मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये गॅसअभावी हॉटेल्स आणि खानावळी हळूहळू बंद पडण्याच्या स्थितीत आहेत.
मुंबई-पुणे आणि परिसरात ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. गॅस टंचाई कायम राहिल्यास विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. पुढील काळात घरगुती गॅसचा तुटवडा देखील निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन केंद्र सरकारशी चर्चा करून तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, गॅस टंचाईचा परिणाम पुण्यातील हॉटेल व्यवसायावरही दिसू लागला आहे. गॅसअभावी अनेक हॉटेल्सना मेन्यू कार्डमध्ये बदल करावा लागत आहे. एकाचवेळी शिजवून तयार करता येणारे पदार्थच ग्राहकांना दिले जात असून ऐनवेळी तयार करावे लागणारे पदार्थ देणे बंद करण्यात आले आहे, अशी माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली.
पुणे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी सांगितले की, सध्या इडली किंवा वडा यांसारखे काही पदार्थ उपलब्ध होऊ शकतात, मात्र डोसा सारखे पदार्थ देणे कठीण झाले आहे. पुढील दोन दिवसांत गॅस पुरवठा पूर्ववत झाला नाही तर पुण्यातील अनेक हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता आहे.