जयकुमार गोरेंनी दाखवला राज ठाकरेंना आरसा

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: महाराष्ट्रात अपक्ष आमदारही निवडून येतात, पक्षाचा (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) एकही आमदार निवडून येत नाही. यावरून कोणाची किती ताकद आहे, याचे अनुमान काढा, असा टोला लगावून सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना आरसा दाखवला आहे.

मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीच ताकद मुंबईत आहेत. इतर पक्षांची ताकद मुंबईत नाही, असा दावा राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केला होता. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना गोरे यांनी राज ठाकरे यांना त्यांच्या पक्षाची ताकद किती हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, अमेरिकेने लावलेला टेरिफचा विषय हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याबाबत केंद्र सरकारशी बोलतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही लवकरच त्यावर तोडगा काढतील आणि कालांतराने बदलेली परिस्थिती दिसून येईल.

ज्या तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे, त्या तालुक्यांची जिल्हाधिकारी माहिती घेत आहेत. पंचनामे सुरू आहेत. आवश्यकता भासल्यास नुकसानग्रस्त भागाची मी स्वतः जाऊन पाहणी करेन. सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, याही परिस्थिती सरकार शेतकऱ्यांना मदत करेल, अशी ग्वाही पालकमंत्री गोरे यांनी दिली.

गोरे म्हणाले, सोलापूर-पुणे-मुंबई विमानसेवेबाबत व्हायबिलिटी गॅप फंडिंग निर्णय आता झालेला आहे. त्यामुळे पुणे, मुंबई आणि इतर ठिकाणी सोलापूरहून विमानसेवा सुरू होईल. इतिवृत्त फायनल होण्याआधीच आपण सोमवारी त्याचे परिपत्रक काढणार आहोत. तो लगेच दिल्लीला पाठवण्यात येईल. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे त्यावर तातडीने कार्यवाही करत आहेत. सर्वकाही सुरळीत पार पडलं, तर आपल्याला अपेक्षित असलेल्या दिवशी ही विमानसेवा सुरू होईल.

मी सोलापूर जिल्ह्यात नवीन आहे. पण एखाद्या हुतात्म्याचं नाव राहणं, चुकीचं आहे. मला जी नावं माहिती होती, ती मी घेतली. त्याव्यतिरिक्त सर्वच हुतात्म्यांना अभिवादन केले आहे आणि त्यांच्याप्रती संवदेनाही व्यक्त केल्या आहेत, असेही त्यांनी कुर्बान हुसेन यांचे नाव घेण्याचे राहून गेल्याबाबत स्पष्टीकरण दिले.

ते म्हणाले, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नांतून गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे येत्या रविवारी सोलापुरात येत आहेत. यापेक्षा वेगळे काही कार्यक्रम नाहीत. त्यानंतर कोल्हापूर येथे खंडपीठाचे उदघाटन करण्यासाठी जाणार आहेत.

फडणवीस असे निमंत्रण स्वीकारत नाहीत

स्वातंत्र्यदिनी मांसाहारी दुकाने बंद ठेवण्यचा निर्णय काँग्रेस सरकारच्या काळातील आहे. त्यामुळे त्याबाबत काँग्रेस नेत्यांना त्याबाबत विचारलं पाहिजे. इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारण्याआधी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना विचारलं पाहिजे. त्यांना मटणपार्टीबाबत निमंत्रण दिलं पाहिजे. फडणवीस हे आशा निमंत्रणाचा स्वीकार करत नाहीत, असेही गोरेंनी जलील यांना सुनावले.