राज्यात दोन उपमुख्यमंत्री तर दोन उपसरपंच पद्धतही लागू करा…

महाराष्ट्र राजकीय

वैजापुर तालुक्यातील माजी सरपंचांची मुख्यमंत्र्यांकडे अजब मागणी…

संभाजीनगर: राज्यात अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आल्याने आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री झाल्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील वैजापुर तालुक्यात असलेल्या मनूर येथील माजी सरपंच राजीव सुदामराव साळुंके यांनी ज्याप्रमाणे राज्यात दोन उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गावांच्या विकासासाठी दोन उपसरपंच निवड पद्धत लागू करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे..

राजीव साळुंके यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “जसे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांची निवड करू शकता, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी प्रत्येक गावात दोन उपसरपंच निवडीची परवानगी द्यावी. गावाच्या विकासासाठी सरपंचाला समर्थन देण्यासाठी व त्यांच्याकडून गावाचे काम करून घेण्यासाठी उपसरपंच हा महत्त्वाचा असतो. आपण केलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या निवडीच्या धर्तीवर आता गावाच्या भल्यासाठी दोन उपसरपंच निवड करता यावी. त्यामुळे यावर सकारात्मक चर्चा करून, कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी विनंती यावेळी निवेदनात करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या मागणीचे निवदेन देखील त्यांनी ई-मेल द्वारे मुख्यमंत्री शिंदे यांना पाठवला आहे. तर मुख्यमंत्री कार्यालयाकडुन त्यांना उत्तर आले असून, सदर मागणी ही ग्रामविकास विभागाकडे वर्ग करण्यात आल्याचा मेल त्यांना मिळाला आहे. त्यामुळे आता त्यांच्या मागणीवर ग्रामविकास विभाग काय निर्णय घेणार हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे. मात्र या अजब मागणीची परिसरात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.