मुंबई लोकल ब्लास्ट प्रकरणी १९ वर्षे गजाआड, तुरुंगात राहून मिळवल्या २२ पदव्या

महाराष्ट्र

नागपूर: मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आणि आता उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी याने नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात राहून २२ पदव्या मिळविल्या आहेत. त्यामध्ये ‘एमबीए’सह तीन विषयात ‘एमए’ या पदव्यांचाही समावेश आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्‍या केंद्राच्या माध्यमातून कारागृहातील कैद्यांसाठी प्रमाणपत्र परीक्षा उपक्रम राबवला जातो. अभ्यासात हुशार असलेल्या एहतेशामने परीक्षा देण्यास सुरुवात केली. त्याने तीन विषयात ‘एमए’ केले. ‘एमबीए’ची पदवीही मिळविली. आतापर्यंत शिक्षेदरम्यान त्याने जवळपास २२ प्रमाणपत्र, पदवी पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. मुक्त विद्यापीठाच्या उपक्रमामुळे एहतेशाम सिद्दीकीचे मन परिवर्तन झाले. त्याची अभ्यासात रुची वाढली. कारागृहातील वेळ त्याने अभ्यासात लावला. आता तो या पदव्या घेऊन तो कारागृहातून बाहेर पडला आहे.

मुंबईत लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर तपास यंत्रणांनी जवळपास ३५० जणांना अटक केली होती. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) न्यायालयाने फैसल शेख, आसिफ खान, कमाल अन्सारी, एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी, नावेद हुसैन रशीद हुसैन खान यांना फाशीची शिक्षा सुनावली.

याशिवाय माजीद शफी, मुजम्मिल शेख, सोहेल शेख और जमीर शेख यांना त्यांना मदत करण्याच्या आरोपाखाली आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. २०१२ ते १६ दरम्यान एहतेशाम सिद्दीकी, हुसैन रशीद हुसैन खान, कमाल अन्सारी आणि मोहम्मद अली आलम शेर शेख हे मुंबईतील कारागृहात होते.

त्यानंतर २०१६ मध्ये त्यांना नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. तेव्हापासून चौघेही इथेच होते. कोरोनादरम्यान कमाल अन्सारीचा मृत्यू झाला. यादरम्यान एहतेशाम याने कारागृहात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या केंद्राच्या माध्यमातून विविध प्रमाणपत्र परीक्षा देण्यास सुरुवात केली. आज सोमवारी उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने बाराही आरोपींची (ता.२१) निर्दोष मुक्तता केली.