मुंबई: ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची जनता दरबारात भेट घेऊन ॲसिड विक्रीवर कठोर नियंत्रण, प्रभावी देखरेख आणि कडक नियमावली लागू करण्याची मागणी केली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी प्रतिनिधींचे म्हणणे आत्मीयतेने ऐकून घेत त्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित जनता दरबारात विविध शिष्टमंडळे, विकासकामांशी संबंधित प्रश्न आणि वैयक्तिक समस्या घेऊन नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देत अनेक प्रश्नांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी आलोक दीक्षित, ॲड. पूजा मोती तसेच ॲसिड हिंसाचारातून संघर्ष करत नव्याने आयुष्य उभारणाऱ्या महिलांनी निवेदन सादर केले. ॲसिड विक्रीवरील नियंत्रण अधिक प्रभावी करण्याबरोबरच पीडित महिलांच्या पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.
या महिलांचा संघर्ष हा केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण समाजाला अधिक संवेदनशील आणि जबाबदार बनवणारा असल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी महायुती सरकार त्यांच्या सन्मानपूर्ण पुनर्वसन, सक्षमीकरण आणि सुरक्षित समाजनिर्मितीसाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला. आवश्यक त्या सकारात्मक उपाययोजना करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.