चंद्रपूर : चंद्रपूर महापालिकेतील महापौरपदाच्या निवडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने भाजपला पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाकरे सेनेवर थेट टीका करत, “भाजपला पाठिंबा देऊन ठाकरे सेनेने राज्यात सर्वात मोठी चूक केली,” असे स्पष्ट वक्तव्य केले.
सपकाळ म्हणाले, “खरंतर ठाकरे सेना आणि आम्ही मिळून भाजपला थांबवण्याची गरज होती. मात्र नेमकं काय घडलं, हे ठाकरे सेनेने स्पष्ट करणे आवश्यक आहे. थेट भाजपला पाठिंबा देणे ही गंभीर बाब आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ते पुढे म्हणाले, “चंद्रपूरमध्ये आम्हाला वंचितसोबत ठाकरे सेनेची गरज होती. आम्ही त्यांना उपमहापौरपद आणि स्थायी समिती अध्यक्षपद देण्यास तयार होतो. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू होती. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या संपर्कात आम्ही होतो. मात्र स्थानिक पातळीवरील नेत्यांनी अक्षम्य गोंधळ घातला.”
दरम्यान, ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीका करत ‘लाज वाटली पाहिजे’ असा टोला लगावला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना सपकाळ म्हणाले, “इतरांची लाज काढण्यापेक्षा चंद्रपूरमध्ये काय घडलं, हे शोधणं महत्त्वाचं आहे. मतदानाच्या वेळी आम्ही एकसंघ होतो. ठाकरे सेनेचे आठ मते आम्हाला मिळाली असती, तर परिस्थिती वेगळी असती.”
रोहित पवारांच्या शंकांवर भाष्य
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या सादरीकरणावरही सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली. “रोहित पवार यांनी मांडलेले प्रेझेंटेशन वस्तुनिष्ठ आहे. अजितदादांवर घातपाताचा संशय जवळपास सिद्ध होण्याच्या टप्प्यावर आहे,” अशी गंभीर टिप्पणी त्यांनी केली.
‘बदला आमचा भाव नाही’
परभणीत ठाकरे सेनेला महापौरपदापासून रोखणार का, या प्रश्नावर सपकाळ म्हणाले, “बदला हा आमचा भाव नाही. आम्ही नीती-मूल्यांवर चालणारे लोक आहोत. मात्र चंद्रपूरच्या घटनेमुळे काँग्रेसचा कार्यकर्ता दुखावला आहे. यानंतर अपेक्षित ती चर्चा किंवा कारवाई झाली नाही.”
ते पुढे म्हणाले, “‘वंचित’ने काही प्रमाणात कारवाई केली. मात्र ठाकरे सेनेने आमच्यावरच उलटे आरोप केले. हे आम्ही सहन करणार नाही. आम्ही भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नाही; पण ठाकरे सेनेबाबत स्थानिक नेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल.”
चंद्रपूरमधील या राजकीय घडामोडींमुळे महाविकास आघाडीत मतभेद उघडपणे समोर आले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.