मुंबई: ठाकरे गटाचे आक्रमक नेते, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून विधान परिषदेत त्यांच्या निरोप समारंभाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. २०१९ मध्ये छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आलेले दानवे, २०२२ मध्ये शिंदे बंडानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झाले. त्या काळात त्यांनी ठाकरे गटाचे जहाल वकिलीत्व केले. सरकारवर सडकून टीका, फडणवीस-शिंदेंना सवाल, आणि सभागृहात ठामपणे ठाकरे गटाचा आवाज – यामुळेच ते उभे राहिले होते.
पुन्हा विधान परिषदेत कसे येणार
सध्याच्या राजकीय गणितांनुसार, त्यांच्या जागेसाठी पुन्हा निवडणूक होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर, जालना महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणे आवश्यक आहे. त्या निवडणुका झाल्याशिवाय विधान परिषदेच्या जागेवर निवडणूक होणार नाही. याचा अर्थ दानवेंना किमान काही महिने तरी बाहेरच राहावे लागणार आहे. त्याचबरोबर, विधानसभेतील सदस्यांमधून निवडून येण्याचा पर्यायही तितकाच कठीण. कारण, ठाकरे गटाकडे सध्या केवळ २० आमदारांचे संख्याबळ आहे, आणि विधान परिषदेच्या जागेसाठी ४० ते ४५ आमदारांची आवश्यकता आहे. त्यामुळे विधानसभेतील मार्गही प्रश्नचिन्हाखाली आला आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, ठाकरे गटाचा हा आक्रमक आवाज काही काळासाठी तरी सभागृहातून गायब होणार, त्यामुळे सरकारला कदाचित सूट मिळू शकते. मात्र, अंबादास दानवे हे केवळ सभागृहापुरते मर्यादित नाहीत, तर ते रस्त्यावरही ठाकरे गटाचे मोठे हत्यार ठरू शकतात. आता पाहावे लागेल, ठाकरे गट त्यांना कोणते नवे भूमिकेवर नेतंय, की विधान परिषदेतील पुनरागमनासाठी निवडणुकांचे कंबर कसणार? पण एक मात्र निश्चित – अंबादास दानवे यांचा राजकीय लढा थांबणारा नाही… सध्या तरी वाट पाहावी लागणार.