मुंबई: परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचा मुद्दा गुरुवारी विधानसभेत चांगलाच गाजला. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीनंतर परिवहन मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आजपासून सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा सभागृहात केली.
वडेट्टीवार यांनी सभागृहात सांगितले की, परिवहन खात्यात चौकशी सुरू असतानाही काही अधिकारी पुन्हा गैरव्यवहार करत असल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे चौकशी निष्पक्ष होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बदली करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावर उत्तर देताना परिवहन मंत्र्यांनी सांगितले की, आरटीओ विभागातील कथित गैरव्यवहारांप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरू आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, योगेश मोरे आणि मोटार वाहन निरीक्षक आनंद मोड यांच्यावरील आरोपांची गंभीर दखल घेण्यात आली असून, या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देत, चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन परिवहन मंत्र्यांनी विधानसभेत दिले.