शिरुर (अरुणकुमार मोटे ) शिरुर तालुक्यातील जांबूत येथे बिबट्याच्या हल्ल्यात ५५ वर्षीय मुक्ताबाई खाडे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि २६) रोजी घडली. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन वर्षांतील मृत्यूची ही पाचवी घटना आहे. मात्र वनविभागाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने ग्रामस्थांसह नातेवाईकांनी वनविभागाच्या कारभारावर संताप व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.
गावातील ग्रामस्थांकडून या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण गाव बंद ठेवुन गावातुन पदयात्रा काढत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी या आंदोलनामध्ये महिलांनी मोठा सहभाग नोंदवला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गावातील मुख्य चौकात शिरुरचे पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे , सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचा फौजफाटा उपस्थित होता. पुढील चौदा दिवसांच्या आत सर्व बिबटे जेरबंद करण्यात येतील असे तोंडी आश्वासन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी या आंदोलनावेळी ग्रामस्थांना दिले असून पुढील दोन दिवसांत मृताच्या नातेवाईकांना २५ लक्ष रुपयांची मदत देण्यात येईल असे सांगण्यात आले.
जांबुत ग्रामस्थांनी याबाबत लेखी आश्वासनाची मागणी केली आहे. मात्र जर पुढील पंधरा दिवसांत योग्य कारवाई करण्यामध्ये दिरंगाई केल्यास अथवा बिबटे जेरबंद न केल्यास सोळाव्या दिवसांपासून साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी मिळालेल्या आश्वासना नंतर नातेवाईकांकडून मृतदेह ताब्यात घेऊन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे , माजी सभापती देवदत्त निकम, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, माजी पंचायत समिती सदस्य अरुणा घोडे यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. तर घटनेवेळी माहिती मिळताच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, राजेंद गावडे यांनी कुटुंबियांची भेट घेतली व बिबट्यांना तातडीने जेरबंद करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
यापुर्वी बिबट्याच्या हल्ल्यात चार जणांचा बळी…
शिरुरच्या बेट भागातील जांबूत , पिंपरखेड , चांडोह , वडनेर खुर्द, शरदवाडी या भागात मोठ्या प्रमाणात बिबट्याचे वास्तव्य आहे. दिवसाढवळ्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने जवळपास शंभरहून अधिक बिबटे या भागात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मागील दोन-तीन वर्षात या परिसरात समीक्षा जोरी या चिमुरडीसह, सचिन जोरी, पूजा नरवडे तर पिंपरखेड येथे पूजा जाधव या चार जणांना बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला आहे.
वनविभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर…
ज्यावेळी अशा प्रकारच्या घटना घडून जातात तेव्हाच प्रशासन उपाययोजना करण्यासाठी पुढे सरसावते. मात्र इतर वेळी प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी केली असता वनविभागाकडुन कायद्याची भाषा वापरली जात असेल तर वनविभाग अजून किती बळी जाण्याची वाट पाहणार…? असा संतप्त सवाल ग्रामपंचायत सदस्य राहुल जगताप यांच्या सह ग्रामस्थांनी उपस्थित केला.
या भागात मोठ्या प्रमाणात बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. बिबट समस्या हा प्रश्न लगेचच सुटणारा नसून बिबट्यांची संख्या ही सातशेहून अधिक झालेली आहे. याबाबत केंद्र व राज्यशासनाकडून योग्य कायदे होण्याची गरज आहे. राज्यातील बिबट हल्ल्यांची संख्या पाहता केंद्रशासनाने त्वरित बिबट्यांच्या नसबंदीचा कायदा संमत करावा अन्यथा ज्या प्रकारे शेतमालाच्या बाजारभाव व इतर प्रश्नांसाठी आंदोलने करावी लागतात तशी आंदोलने या बिबट नसबंदीच्या कायद्यासाठी करावी लागतील
देवदत्त निकम
(माजी सभापती)
जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार, जांबुत येथील चौथी घटना, वनविभागाचा गलथान कारभार समोर