शिरूर नगरपरिषदेचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव; विसर्जनासाठी अनोखी दिशा 

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): यंदाच्या गणेशोत्सवात शिरूर नगरपरिषदेकडून राबविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांनी शहरातील गणेशभक्तांना एक नवी दिशा दिली आहे. मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी स्वतः मिरवणुकीचा मार्ग प्रत्यक्ष पाहणी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या अनुषंगाने रस्त्यांची दुरुस्ती, पथदिवे सुरळीत करणे, वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटणे व विसर्जन घाटांची स्वच्छता यावर विशेष भर देण्यात आला आहे.

नदी प्रदूषण टाळण्यासाठी नगरपरिषदेने विशेष पुढाकार घेतला आहे. शनि मंदिर विसर्जन घाट, दशक्रिया विधी घाट आणि रयत शाळा मैदान येथे कृत्रिम विसर्जन हौद/कुंभ उभारण्यात आले आहेत. तसेच निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र कलश उपलब्ध करून दिलेले असून नदी स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांना निर्माल्य यामध्येच टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गणेश विसर्जनाच्या पाचवा, सातवा व अकरावा दिवशी शहरात सुव्यवस्था राहावी म्हणून नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरण राखण्याकडे प्रशासनाचे विशेष लक्ष आहे.

शिरूर नगरपरिषद आणि टोफे होम फूड डिलिव्हरी ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये गणेशभक्तांना घरापासून विसर्जन घाटापर्यंत मोफत वाहन सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

फ्री विसर्जन वाहन बुक करण्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधन्याचे आवाहन केले आहे.

9923111161 / 7499192196 / 7263800707

नगरपरिषदेकडून “श्री गणेश मूर्ती संकलन उपक्रम” देखील राबविण्यात येणार आहे. यात स्वयंस्फूर्तीने मूर्ती संकलन उपक्रमात सहभाग घेणाऱ्या भक्तांना “पर्यावरण दूत” प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले की विसर्जनासाठी कृत्रिम हौद/कुंभांचा वापर करावा किंवा मूर्ती संकलन उपक्रमात मूर्ती द्याव्यात. निर्माल्य नदीपात्रात न टाकता उपलब्ध कलशात टाकावे.नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने विसर्जनावेळी विशेष काळजी घ्यावी.

“नदी स्वच्छ राखण्यासाठी, नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होऊ नयेत व पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना अधिक बळकट व्हावी यासाठी सर्व गणेशभक्तांनी प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.शिरूर नगरपरिषदेचे हे उपक्रम पर्यावरणपूरक व सुरक्षित गणेशोत्सवाच्या दिशेने एक आदर्श पाऊल ठरत असून शहरातील नागरिकांकडून त्याचे स्वागत होत आहे.