शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगर परिषदेचा जलशुद्धीकरण प्रकल्प जो नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या तो प्रचंड दुर्दशेला सामोरा जात आहे. स्वच्छतेचा अभाव, देखरेखीची कमी आणि यंत्रणांची मोडतोड यामुळे संपूर्ण केंद्रच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बदलले आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी अचानक दौरा करून केंद्राची पाहणी केली आणि प्रशासनाच्या हलगर्जी कारभारावर खरमरीत टीका केली.
सिद्धीच्या पहाडाजवळ वसलेले हे जलशुद्धीकरण केंद्र सध्या भंगार आणि कचऱ्याच्या डेपोतच रूपांतरित झाले आहे. बांधकाम साहित्याचा राडारोडा, मोकळ्या क्लोरीनच्या गोण्या, आणि घोडनदीवरून येणाऱ्या पाण्याची दुर्गंधी यामुळे आमदार कटके संतप्त झाले. विशेष म्हणजे, पाहणीवेळी कोणताही जबाबदार अधिकारी केंद्रावर उपस्थित नव्हता. उपस्थित कर्मचाऱ्यांना प्रक्रियेची पुरेशी माहितीही नव्हती.
हे जलशुद्धीकरण केंद्र की कचरा डेपो; आमदार कटके
पाहणीनंतर आमदार कटके म्हणाले, “इतक्या मोठ्या शहरासाठी लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेली योजना जर नागरिकांना शुद्ध पाणी देण्यात अपयशी ठरत असेल, तर ती बंद करून दुसरा पर्याय शोधावा लागेल.”
पाहणीदरम्यान, नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील लिपिक भूषण कडेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि सद्यस्थितीची माहिती दिली. आमदार कटके यांनी प्रकल्पाच्या सौंदर्यीकरणासाठी विशेष निधी मिळवण्याचे आश्वासन दिले. परिसराची तातडीने स्वच्छता करून हिरवळ विकसित करणे, जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करून वनराई तयार करणे आणि यासाठी आराखडा सादर करण्याचे निर्देश त्यांनी नगर परिषदेला दिले.
१९८९ मध्ये उभारले गेलेले हे जलशुद्धीकरण केंद्र सध्या जुने झाल्यामुळे विविध दुरुस्ती कामे सुरू आहेत. मात्र त्यासोबतच नियमित देखभाल आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने प्रकल्पाची सद्यस्थिती चिंताजनक आहे. या पाहणी दौऱ्यात श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष एजाज बागवान, तसेच स्वप्नील रेड्डी, अतुल गव्हाणे, हर्षद ओस्तवाल, वसीम शहा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.