मुंबई: स्टार प्रवाहवरील सुपरहिट मालिका लग्नानंतर होईलच प्रेम सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकेतील जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्या या दोन्ही जोडप्यांनी प्रेम जुळल्यानंतर पुन्हा एकदा स्वखुशीने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे.या खास प्रसंगानिमित्त दोन्ही जोडप्यांची वरात थेट मुंबईच्या रस्त्यांवरून दणक्यात निघाली. लालबागच्या राजाचा आशीर्वाद घेत या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यात आली.
ढोल-ताशांच्या गजरात रंगली वरात
जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्या यांच्या लग्नाची वरात वाजतगाजत, ढोल-ताशांच्या तालावर आणि पारंपरिक लग्नगीतांच्या सुरावटीत लालबागच्या रस्त्यांवरून निघाली. व्हिंटेज कार, पारंपरिक वेशभूषेतील वऱ्हाडी मंडळी आणि जल्लोषात नाचणारे चाहते यामुळे हा सोहळा अधिकच लक्षवेधी ठरला.मुंबईकरांनीही या अनोख्या लग्नसोहळ्याचा आनंद लुटला. विशेष म्हणजे, मराठी मालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच चाहत्यांनी प्रत्यक्ष लग्न सेलिब्रेशनमध्ये सहभागी होत कलाकारांसोबत हा क्षण साजरा केला.
कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया
जीवाची भूमिका साकारणारा विवेक सांगळे म्हणाला,“मी मुळचा मुंबईतील लालबागचा आहे. मालिकेतील इतका महत्त्वाचा टप्पा लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने पार पडतोय, याहून मोठं भाग्य काय असू शकतं? हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील.”
नंदिनीची भूमिका साकारणारी मृणाल दुसानिस म्हणाली, “प्रेक्षकांसोबत अशा पद्धतीने लग्न साजरं करणं हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात सुंदर अनुभवांपैकी एक आहे. लालबागच्या राजाच्या चरणी नव्या प्रवासाची सुरुवात करताना प्रचंड आनंद होत आहे.”
पार्थची भूमिका साकारणारा विजय आंदळकर म्हणाला,“ढोल-ताशे, वऱ्हाडी, चाहते आणि बाप्पांचा आशीर्वाद… सगळंच स्वप्नवत वाटतंय. प्रेक्षकांनी आम्हाला कुटुंबासारखं प्रेम दिलंय, यापुढेही तसंच प्रेम मिळेल याची खात्री आहे.”
काव्याची भूमिका साकारणारी ज्ञानदा म्हणाली,“हा लग्नसोहळा केवळ मालिकेपुरता मर्यादित न राहता प्रेक्षकांसोबत साजरा करता आला, याचा खूप आनंद आहे. चाहत्यांकडून इतकं प्रेम मिळेल असं वाटलं नव्हतं. हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय आहे.”एकूणच, मालिकेतील हा लग्नसोहळा केवळ पडद्यावरच नाही तर प्रत्यक्षातही रंगला आणि प्रेक्षकांच्या मनात कायमचा घर करून गेला.