मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते; पण संकटाच्या क्षणी तुम्ही प्रत्यक्ष मदतीला धावून येता, याची खात्री आज पटली,” अशा शब्दांत इंदिरा युनिव्हर्सिटीच्या अध्यक्षा तरिता शंकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. युद्धजन्य परिस्थितीत दुबई येथे अडकलेल्या ८४ विद्यार्थ्यांना विशेष विमानाने सुरक्षित मायदेशी परत आणल्याबद्दल त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आभार मानले.
अमेरिका–इस्त्रायल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे मध्यपूर्वेतील वातावरण अचानक अस्थिर झाले. त्याच काळात पुण्यातील इंदिरा युनिव्हर्सिटीचे ८४ विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी Dubai येथे गेले होते. युद्धाचा भडका उडाल्यानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने हे सर्व विद्यार्थी तिथेच अडकून पडले.
ही बाब समजताच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ प्रशासनाशी समन्वय साधत परिस्थितीची दखल घेतली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आणि सर्व ८४ विद्यार्थ्यांना काल रात्री सुखरूप भारतात परत आणण्यात आले.
विद्यार्थी मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. तरिता शंकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत त्यांच्या तत्पर हस्तक्षेपाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.संकटाच्या वेळी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतल्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या संवेदनशील आणि निर्णयक्षम नेतृत्वाचे पुन्हा एकदा दर्शन घडल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.