मुंबई: नागपूर येथील SBL कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात २२ निष्पाप कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून विधानसभेत जोरदार खळबळ उडाली. हा प्रकार केवळ हलगर्जीपणा नसून प्रशासकीय यंत्रणा आणि कंपनी मालकांच्या संगनमताने केलेले ‘हत्याकांड’ असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करताना वडेट्टीवार यांनी एफआयआरमधील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “२२ जणांचा जीव गेला असताना आरोपींना दुसऱ्याच दिवशी जामीन मिळेल अशी कलमे का लावली? कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करण्यात आला नाही?” असा सवाल त्यांनी सरकारला केला. सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याची टीकाही त्यांनी केली.
सुरक्षा नियमांची पायमल्ली
प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या गंभीर त्रुटींचा उल्लेख करताना वडेट्टीवार म्हणाले
कंपनीत फायर पंप नव्हते.
रिस्क असेसमेंट करण्यात आले नव्हते.
नियमानुसार दोन सेफ्टी ऑफिसर आवश्यक असताना फक्त एकच कार्यरत होता.
फॅक्टरी मेडिकल ऑफिसर म्हणून नियुक्त डॉ. शशांक डोंगरे कधीही प्रत्यक्ष हजर नव्हते.
कंपनीत सीसीटीव्ही यंत्रणा नव्हती.
इंटरनल सेफ्टी ऑडिटची कोणतीही नोंद उपलब्ध नाही.
स्फोटक हाताळण्याचे आवश्यक प्रशिक्षण कामगारांना देण्यात आले नव्हते.
अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी
पेसोचे मुख्यालय नागपुरात असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी केली नाही, असा आरोप करत कामगार अधिकारी आणि निरीक्षकांनी केवळ पैशासाठी लोकांच्या जीवाशी खेळ केल्याचा घणाघात वडेट्टीवार यांनी केला. सुरक्षिततेचे प्रमाणपत्र देणाऱ्या निरीक्षकाला तात्काळ निलंबित करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
मंत्र्यांच्या उत्तरावर नाराजी व्यक्त करत, “दीड वर्षांत इतके स्फोट होऊनही सरकार नेमकी काय कारवाई करत आहे? अधिकाऱ्यांना का पाठीशी घातले जाते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, संबंधित सुरक्षा निरीक्षक आणि पेसो अधिकाऱ्यांना सहआरोपी करावे तसेच स्फोटकांचा साठा आणि परवानग्यांची सखोल चौकशी करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.मंत्र्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने विरोधकांनी सरकारचा निषेध करत सभात्याग केला.