नाथषष्ठीत ‘नाथांचा रांजण’ भरला; पैठणमध्ये भक्तीचा जल्लोष

महाराष्ट्र

पैठण: नाथषष्ठी उत्सवानिमित्त पैठण येथे पारंपरिक ‘नाथांचा रांजण भरणे’ हा धार्मिक सोहळा शनिवारी मोठ्या भक्तिभावात पार पडला. भाविकांनी गोदावरी नदीतून पवित्र जल आणून संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील पवित्र रांजण भरत शतकानुशतके चालत आलेली परंपरा यंदाही जपली.

परंपरेनुसार भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ‘श्रीखंड्या’ या रूपात तब्बल १२ वर्षे संत एकनाथ महाराजांच्या सेवेत राहून गोदावरीचे पाणी आणून रांजण भरण्याचे कार्य केले, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्या स्मृती जागवत दरवर्षी नाथषष्ठीनिमित्त भाविक गोदावरीचे पाणी घागरीत भरून आणतात आणि संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील रांजण भरतात.

यंदा हा पवित्र रांजण शनिवारी सकाळी ७.५० वाजता संतोष विठ्ठलराव कुलकर्णी (रा. पैठण) यांच्या घागरीतील गोदावरीच्या पाण्याने भरला. रांजण भरताच उपस्थित भाविकांनी जयघोष करत आनंद व्यक्त केला. ही बातमी वाऱ्यासारखी पैठण शहर व परिसरात पसरताच नाथ भक्तांनी एकमेकांना आलिंगन देत संत एकनाथ महाराज व भगवान श्रीखंड्याचा जयजयकार केला.

यावेळी नाथवंशज रघुनाथबुवा नारायणबुवा गोसावी पालखीवाले यांनी संतोष कुलकर्णी यांचे ‘श्रीखंड्या’ अर्थात श्रीकृष्णाचे रूप मानून त्यांचे विधीवत पूजन केले. नाथषष्ठीच्या पारंपरिक विधींनुसार हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पैठणमध्ये नाथषष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून राज्यभरातून हजारो भाविक येथे दाखल झाले आहेत. संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील रांजण भरण्याचा सोहळा नाथषष्ठी उत्सवातील प्रमुख धार्मिक परंपरांपैकी एक मानला जातो.

दरम्यान, रांजणाला सुशोभित चांदीचा पत्रा बसवून रांजणातील पाणी कायमस्वरूपी शुद्ध राहील अशी व्यवस्था करावी, अशी मागणी वारकरी व नाथ भक्तांनी केली आहे. तसेच गावातील नाथ मंदिरात तुकाराम बीजेपासून पुरोहित रवींद्र साळजोशी यांचे नाथ चरित्रावरील प्रवचन सुरू असून ते ८ मार्चपर्यंत चालणार आहे.

नाथषष्ठीत सहभागी होण्यासाठी लाखो भाविक पैठणकडे येत असून हजारो वाहनेही शहरात दाखल होत आहेत. दिंड्यांमधील भाविकांसाठी अन्नदान व स्वयंपाक करताना गॅस टाक्यांचा काळजीपूर्वक वापर करावा, तसेच पैठण व परिसरातील पेट्रोल पंपांवर वाहनांना पेट्रोल-डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा, अशी उपाययोजना जिल्हाधिकारी व तहसील प्रशासनाने करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे